लोणी |वार्ताहर| Loni
बोगस आणि खोटे मतदार संबोधून त्यांच्याच तालुक्यातील मतदारांचा अपमान ते करीत आहेत. पराभव झाल्यामुळे आता चाळीस वर्षानंतर तुम्हाला मतदार बोगस वाटायला लागले का? असा सवाल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. लोणी येथे माध्यमांशी बोलतांना ना. विखे पाटील म्हणाले, आयोगाकडून मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर त्यावर हरकती घेण्यासाठी मुदत दिली जाते, मात्र आज आयोगावर आरोप करणारे तेव्हा झोपले होते का? असा प्रश्न करून पराभव झाला म्हणून थेट मतदारांनाच बोगस आणि खोटे ठरविण्याचा प्रयत्न म्हणजे एकप्रकारे त्यांचा अपमान आहे. मग तुम्हाला निवडून देतानाही बोगस मतदान होत का? कोणत्याही निवडणुकीचा निकाल खुल्या मनाने स्वीकारला पाहिजे, असे मंत्री विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
निळवंडे संदर्भात थोरातांनी केलेल्या टिकेला उतर देण्याची आवश्यकता नाही. जनतेनेच त्यांना विधानसभेला उतर दिले आहे. त्यांनीच आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास केला गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल माझे वक्तव्य नव्हते. त्यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करण्याचा प्रश्नच नाही. तसे माझ्याकडून कधीही झालेले नाही, असे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले, अनेक वर्ष देशात कृषी मंत्री पदावर राहूनही ज्यांना सहकारी कारखानदारी बाबत कोणतेही निर्णय करता आले नाहीत, अशा जाणत्या राजांना जाणीव करून देण्यासाठी मी बोललो. कारण एकीकडे सरकारच्या मदतीची अपेक्षा ठेवायची पण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अहवालात केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्याचे मोठे मनही दाखवायचे नाही.
याबाबतची वस्तूस्थिती मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने व्हीएसआयच्या पदाधिकार्यांच्या शिष्टमंडळाला सांगितली होती आणि तोच संदर्भ माझ्या भाषणात होता. सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात आयकराचा बोजा कमी करण्याचा किंवा इथेनॉल धोरणाचा निर्णय घेऊन राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्याचे मोठे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही यासाठी मोठे सहकार्य मिळाले. अनेक वर्षे राज्यातील जाणते राजे फक्त केंद्राकडे शिष्टमंडळ घेऊन जात होते, पण कोणताही निर्णय त्यांना करता आला नाही, याकडे मंत्री विखे यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
गोकुळाष्टमी आणि दहीहंडी आपला पारंपरिक उत्सव आहे. थरावर थर लावून हंडी फोडण्याच्या साहसी खेळामुळे सर्वांना एकत्रित येण्याची संधी मिळते. गोविंदाच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने विमा योजना सुरू केली आहे. दहीहंडीची लोकप्रियता वाढत आहे. महायुतीचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे थर लावत आहे.





