संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
शहरातील मालपाणी लॉन्स येथे सार्वजनिक कार्यक्रमानंतर आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) हे बाहेर पडत असताना एकाने त्यांच्यावर हल्ला (Attack) केल्याची घटना गुरुवारी (दि.२८) रात्री घडली आहे. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. यामुळे पोलिसांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.
आमदार खताळ हे मालपाणी लॉन्स येथे कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमानंतर ते बाहेर पडत असताना एका तरुणाने हस्तांदोलन करण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला (Attack) केला आहे. या घटनेची माहिती समजताच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. या हल्ल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे. हल्ला करणार्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तर आमदार खताळ यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी हल्ला करणाऱ्यास ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करत आहे.
संगमनेर शहरात आमदार अमोल खताळ यांच्याबाबत घडलेली घटना अत्यंत चुकीची आहे. आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. पोलिसांनी निपक्षपणे या घटनेची चौकशी करावी व सत्य आणि वस्तुस्थिती स्पष्ट करणारे निवेदन पोलिसांमार्फतच प्रसारित करण्यात यावे.
– अजय फटांगरे (तालुकाध्यक्ष,-संगमनेर तालुका काँग्रेस)
ना. विखे यांच्याकडून तीव्र निषेध
महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दांत निषेध केला असून, हल्लेखोरांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. तसेच आमदार खताळ यांच्याशी संपर्क साधून त्यांची चौकशी केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनाही त्यांनी हल्लेखोराच्या तपासाचे आदेश दिले. ज्यांना लोकशाही मान्य होत नाही त्यांना ठोकशाहीच मान्य असते. असे हल्ले करून महायुतीच्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास कमी करण्याचा कोणी कितीही प्रयत्न करीत असेल तर त्यांना त्यामध्ये यश येणार नाही. महायुतीचे कार्यकर्ते त्याच पध्दतीने उत्तर देतील असेही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.





