श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर हा प्रभू श्रीरामाचे नाव असलेला देशातील पहिला नवीन जिल्हा व्हावा, अशी मागणी राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. हेमंत ओगले यांनी केली आहे. भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूरला स्वतंत्र जिल्हा घोषित करावा, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासूनची आहे. या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांसह सर्वपक्षियांनी यापूर्वी श्रीरामपूर बंदसह अनेक आंदोलने करुन श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची मागणी केलेली आहे. श्रीरामपूरमध्ये असलेली रेल्वेलाईन, अपर पोलीस अधिक्षक कार्यालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, एसटी कार्यशाळा, भव्य एमआयडीसी, पोस्ट कार्यालय यासह शहराच्या परिसरात शेती महामंडळाची मोठ्या प्रमाणात जमिन उपलब्ध असल्याने, अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होऊन उत्तरनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच जिल्ह्याचे मुख्यालय होण्यासाठी सर्वार्थाने योग्य ठिकाण आहे.
श्रीरामपूर जिल्हा व्हावा ही सर्वसामान्य श्रीरामपुरकरांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. यासाठी अनेकदा सह्यांची मोहीम राबविण्यात आलेली असून सर्वपक्षिय आंदोलनेही झालेली आहे. मात्र अद्यापपर्यंत श्रीरामपूर जिल्हा होण्याबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाने लवकरात लवकर अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन करुन श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा, अशी मागणी श्रीरामपूरचे आ. हेमंत ओगले यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. त्यामुळे जिल्हा निर्मितीचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.




