
नेवासा |शहर प्रतिनिधी| Newasa
महिनाभरात नेवासा शहरातील अतिक्रमणे न काढल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून अतिक्रमण काढावे लागेल. अन्यथा पुढचा मोर्चा लोकशाही मार्गाऐवजी ठोकशाही पद्धतीने काढला जाईल, असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला. नेवासा शहरातील खोलेश्वर गणपती चौक ते नगरपंचायत दरम्यानच्या रस्त्यावरील फळ गाड्यांच्या अतिक्रमण विरोधात निवेदन दिल्याने भाजपा पदाधिकार्याच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी नेवासा शहरात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी आ. संग्राम जगताप बोलत होते. या मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम महाराज भंडारे, आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते.
प्रथम प्रभु श्रीराम, भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. आमदार संग्राम जगताप म्हणाले, नेवासा ही संत-महंतांची भूमी आहे. भाजपा पदाधिकारी यांनी कायदेशीर मार्गाने अतिक्रमणाबाबत अर्ज दिला होता. कायद्याने वागत असतानाही हल्ला होतो. शासनाची कोणत्याच प्रकारच्या अतिक्रमणास मान्यता नाही. येणार्या गणपती,नवरात्र उत्सवाचा विचार करून प्रशासनाने तालुक्यातील गो-तस्करीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. गो-तस्करीबाबत आम्ही पोलिसांना फोन करतो, कारवाई करत नसाल तर लेखी द्या. लहानपणापासून आम्ही पहाटे पाचचा आवाज ऐकतो, तो बंद करा मग आमच्यासाठी नियम लावा. सर्वांना समान कायदा लागू करावा. महिनाभरात अतिक्रमण न काढल्यास आम्हालाच रस्त्यावर उतरून अतिक्रमण काढावे लागेल.अन्यथा पुढचा मोर्चा लोकशाही मार्गाऐवजी ठोकशाही पद्धतीने काढला जाईल.
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, पैस खांब मंदिराकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर मोठे अतिक्रमण झाले आहे. बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असून प्रवरा नदीपात्रात रक्तमिश्रीत पाणी दिसत असून त्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी. नाशिक पोलिसांप्रमाणे नेवासा पोलिसांनीही ठोस कारवाई करावी. दगडफेक करणार्या आरोपींची गावातून धिंड काढावी. मंदिराकडे जाणारा मार्ग कायमस्वरूपी मोकळा ठेवण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमणधारकांवर कठोर कारवाई करावी. राज्यात लवकरच लव्ह जिहाद कायदा येईल, त्यात मुलींचे वय 18 वरून 21 करून आई-वडिलांच्या संमतीची अट असावी अशी तरतूद करावी.
संग्राम महाराज भंडारे म्हणाले की, आमच्या हाडांना कान लावले तरी भारत माता की जय आवाज येतो, मात्र काही जण या मातीला आई मानत नाही, म्हणूनच वंदे मातरम् ला विरोध केला जातो. त्यामुळेच सार्वजनिक रस्ते देखील पोट भरण्याचे साधन वाटतात. यापुढे रस्ते फक्त वाहतुकीसाठी वापरले जातील. रस्त्यावर फळगाड्या लावून उभे राहिले जाते. आम्हाला संविधान टिकवायचे आहे म्हणून कायदा हातात घेत नाही. हल्याच्या घटनेनंतर आम्हाला इथे येण्याची गरज पडली. काही आरोपींना अटक केली असे पोलीस म्हणतात, मात्र त्यांची धिंड काढली तर यापुढे कोणी हिंमत करणार नाही. अतिक्रमण तात्काळ हटवावे, अन्यथा दर महिन्याला मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. सूत्रसंचालन अॅड. मयूर वाखुरे यांनी केले. वंदेमातरम, पसायदानाने मोर्चाची सांगता झाली.




