मुंबई | Mumbai
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सुद्धा मनसे आणि शिवसेनेच्या युतीवर रोज बोलत आहेत. त्यामुळे राज्यात या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत केलेल्या एका वक्तव्यावरून या चर्चांना सुरुवात झाली. मात्र, या चर्चेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, मनसे नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन युतीबाबतची भूमिका स्पष्ट करतानाच शिवसेनेसमोर एक मोठी अट ठेवली आहे.
संदिप देशपांडे काय म्हणाले?
कोणतीही युती ही कॅमेरासमोर बोलून होत नाही. त्यासाठी योग्य ती प्रक्रिया असते. शिवसेना ठाकरेंकडून अद्याप कोणताही युतीचा प्रस्ताव आला नाही असे मनसे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात कोणतीही चर्चा पक्षांतर्गत झाली नाही. आमचे तोंड दुधाने पोळले गेले आहे, त्यामुळे आम्ही ताकही फुंकून पितो. जोपर्यंत कोणताही ठोस प्रस्ताव राज ठाकरेंपर्यंत पोहोचत नाही, तोवर आम्ही निर्णय घेणार नाही. ज्यावेळेला येईल, त्यावेळी योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील”, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.
तेव्हा बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते
2014 आणि 2017च्या घटनांचा मी साक्षीदार आहे. जेव्हा युती करावी अशी आमची भावना होती, तेव्हा बाळा नांदगावकर मातोश्रीवर गेले होते. उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. सुभाष देसाई त्यांना भेटले. युती करावी असा राज ठाकरे यांचा निरोप आहे, असा निरोप घेऊन बाळा नांदगावकर मातोश्रीत गेले होते. याला म्हणतात प्रस्ताव. तसा कोणताही प्रस्ताव आता ठाकरे गटाकडून आमच्याकडे आला नाही. जोपर्यंत प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत राज ठाकरे कसा निर्णय घेऊ शकतात? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला.
…तर राज ठाकरे १०० पावले पुढे येतील
मनसेचे नेते अविनाश जाधव म्हणाले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या भावनांचा आम्ही आदर करतो. युती ही काही एक दिवसात होत नाही. त्यासाठी एक प्रक्रिया असते. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच राज ठाकरे करतील हे नक्की. जे सर्व नेते कॅमेरासमोर युतीसंदर्भात बोलतात त्यांनी एकदा उद्धव ठाकरेंना सांगावे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना एक कॉल करावा. आम्ही खात्रीशीर सांगतो, तुम्ही एक पाऊल पुढे आला तर राज ठाकरे १०० पावले पुढे येतील हे नक्की.
अमित ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे दोन्ही भावांकडे एकमेकांचा नंबर आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी आता उद्धव ठाकरे यांच्याकडून एक कॉल येणे ही अपेक्षा आहे असे अविनाश जाधव म्हणाले.
परिवर्तन होत आहे
संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या घराला कॅफे म्हणून हिणवायचे. मात्र, आज राऊत यांनी आमच्यासाठी राज ठाकरे यांचे घर हे दुसरे घर आहे, असे विधान केले. त्यावरून संदीप देशपांडे यांनी राऊत यांना टोला लगावला. पुस्तक लिहिल्यानंतर राऊत यांच्या विचारात परिवर्तन झाले असेल तर स्वागत करतो. परिवर्तनही संसार का नियम आहे, असे गीता सांगते. त्यांनी गीता वाचली असेल तर स्वागत आहे. कॅफे हे राऊतच म्हणाले होते. घरही तेच म्हणत आहेत. परिवर्तन होत आहे, असा चिमटा देशपांडे यांनी काढला.
संजय राऊत काय म्हणाले?
नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. राज ठाकरे यांचे सहकारी आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारी या विषयावर अत्यंत सकारात्मक आहेत. त्याचाच परिणाम जमिनीवर कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले असेल. त्यात चिंता करण्यासारखे काय आहे, उलट या गोष्टीचे स्वागत करायला हवे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे या मुलांच्या जन्माच्या आधीपसून हे भाऊ आहेत ना. मी दोघांनाही पाहिले आहे. १० मिनिटांनी मी आता राज ठाकरेंना फोन करणार आहे किंवा १० मिनिटांनी मी आता उद्धव ठाकरेंना फोन करतो, असा सोशल मीडियावर मेसेज टाकून दोन्ही बंधू एकमेकांना फोन करणार नाही. काय सांगावे, फोन झालेही असतील, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले.
अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून ओळखतो. जसे आदित्य ठाकरे आहेत, तसेच ते आहेत. त्यांची विधानेही गोड आहेत. अमित ठाकरे यांच्या मनात जी भावना आहे, त्याचे काका म्हणून मी स्वागत करतो. अमित ठाकरे यांची अलीकडील विधाने चांगली आहेत. आदित्य ठाकरेंची भूमिकाही चांगली आहे. अजून मनोमिलन काय हवे आहे. मी कॅफेमध्ये नाही, मी घरी जाईन. आमच्यासाठी ते कॅफे नाही, आमच्यासाठी ते दुसरे घर आहे, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा