सिन्नर | वार्ताहर | Sinnar
जुन्या प्रस्तावित मार्गानेच नाशिक-पुणे रेल्वे (Nashik-Pune Railway) व्हावी यासाठी खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) आग्रही असून या बहुप्रतीक्षित आणि चर्चित सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत त्यांनी पुन्हा एकदा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत त्यांना साकडे घातले. या विषयासंदर्भात आतापर्यंत खा. वाजे यांनी वैष्णव यांची पाचव्यांदा भेट घेतली. यापूर्वी हा प्रकल्प पूर्वीच्याच अर्थात नाशिक, संगमनेर, नारायणगाव, चाकण मार्गेच होण्याबाबत रेल्वेमंत्रीदेखील आग्रही होते. मात्र पुन्हा शिर्डी, अहिल्यानगरमार्गे प्रकल्प उभरण्याबाबत चाचपणी केली जात असल्याचे वैष्णव यांनी पुणे दौऱ्यावर (Pune Tour) असताना म्हटले होते. याबाबत खा. वाजे यांनी नाराजी व्यक्त करत हा रेल्वेमार्ग जुन्या प्रस्तावित मार्गानेच व्हावा यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे.
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग हा फक्त नाशिक आणि पुणे या शहरांसाठी, दरम्यानच्या भागासाठी नव्हे तर पश्चिम भारताला दक्षिण भारताशी जलद गतीने जोडण्यासाठीदेखील महत्त्वपूर्ण असल्याचे खा. वाजे यांनी स्पष्ट करत जुन्याच मार्गाने प्रकल्प होणे का गरजेचे आहे, नागरिकांची (Citizen) काय मागणी आहे याबाबतची कैफियतच वैष्णव यांच्यासमोर मांडली. सातत्याने नवनवीन अडचणी निर्माण होऊन हा प्रकल्प रखडला आहे. जुन्या मार्गासाठी महारेलने बऱ्यापैकी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे व या प्रकल्पाचा डीपीआरदेखील तयार आहे. राज्य सरकारही याबाबत सकारात्मक असताना हा प्रकल्प रखडणे दुर्भाग्यपूर्ण असल्याची भावना खा. वाजे यांनी वैष्णव यांच्यापुढे व्यक्त केली.
काही जमिनीचे अधिग्रहण
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी याआधीच महारेलकडून कामाला सुरुवात झालेली आहे. त्या माध्यमातून नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात काही जमिनीचे अधिग्रहणदेखील झाले आहे. यात नाशिक जिल्ह्यात २३७.८६ हेक्टर, अहिल्यानगर जिल्ह्यात २२८.२०५ तर पुणे जिल्ह्यात ४५६.२७ हेक्टर जमीन अधिग्रहण अपेक्षित आहे. त्यातील ७९.७६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण झाले आहे.
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्प हा जुन्या प्रस्तावित मार्गानेच व्हावा यासाठी राज्य सरकारदेखील सकारात्मक आहे. नाशिक आणि पुणे शहरांना जोडले जाणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातून नाशिक आणि परिसरात उद्योगांना मोठी चालणा मिळणार आहे. रोजगाराच्या संधी उभारल्या जातीलच त्यासोबत दक्षिण भारताला उत्तर आणि पश्चिम भारताशी नाशिकच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रस्तावित जुन्या मार्गानेच व्हावा यासाठी मी आग्रही आहे.
खा. राजाभाऊ वाजे