मुंबई | Mumbai
येत्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Local Body Election) घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले असून मोठ्या प्रमाणावर पक्षांतराचे वारे वाहत आहे. शिंदेंच्या शिवसेसह भाजप आणि राष्ट्रवादीत महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षप्रवेश करत आहेत. त्यामुळे सत्ताधारी महायुतीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी महाविकास आघाडीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न चालू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पक्ष फुटण्याबाबत मोठे विधान केले आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात नवा उदय होणार आहे. मला कुणाची नावे घ्यायची नाही. पंरतु, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी आणि मूळ शिवसेना फोडण्यात आली, त्याच पद्धतीने अजित पवारांचा पक्ष फोडला जाईल, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेंचा पक्ष फोडला जाईल कारण भाजपाला पक्ष फोडण्याची चटक लागली आहे. तसेच भाजपसोबत (BJP) केंद्रामध्ये सत्तेत सहभागी असलेले चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचाही पक्ष फोडला जाईल. भाजपच्या दाताला, जिभेला पक्ष फोडण्याचे रक्त लागले असून ही चटक आहे, तोपर्यंत हे फोडाफोडीचे राजकारण सुरू राहील”, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच “मनसे आणि शिवसेना (MNS and Shivsena) एकत्र येणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की,” मनसे आणि आमची शिवसेना कधीही एकत्र येणार नाही. आम्ही एक ठोस भूमिका घेतली आहे, आणि जे पक्ष महाराष्ट्राची लूट करतात, तसेच त्यांना मदत करणारे पक्ष आहेत, त्यांच्यासोबत आम्ही कधीही सहकार्य करणार नाही. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात एकत्र येण्याची शक्यता नाही”, असे राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.
तर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्ष (Mahavikas Aaghadi) वेगवेगळे लढणार असल्याच्या मुद्द्यावर राऊतांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले की “आज पुणे किंवा पिंपरी चिंचवड भागातील पदाधिकाऱ्याच्या बैठका आहेत. विधानसभा, लोकसभा निवडणूका संपल्या आहेत. लोकसभेत आम्ही जिंकलो, विधानसभेत पराभूत झालो. त्याची कारणे देशाला समजली आहेत. त्या पराभवाने खचून न जाता पुढील सर्व निवडणूका आम्हाला लढवाव्याच लागतील, त्यासाठी तयारी सुरू आहे. स्वबळाचा नारा दिला याचा अर्थ महाविकास आघाडी संपली किंवा तुटली असा काढता येणार नाही. हा विषय मुंबई (Mumbai) पुरता आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, त्या मुंबईवर अनेक वर्षांनी शिवसेनेचा पगडा आहे. शिवसेनेने येथे सातत्याने आपली पकड ठेवली आहे आणि ती तशीच ठेवायची असेल तर स्वबळावर लढले पाहिजे असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्या कार्यकर्त्यांच्या भावना शिवसेना पक्ष प्रमुखांनी व्यक्त केली आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.