मुंबई | Mumbai
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणात (Murder Case) भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी रान उठवत मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) आणि आमदार धस यांची गुपचूप भेट झाली होती. त्यामुळे आमदार सुरेश धस विरोधकांच्या निशाण्यावर आले असून त्यांच्यावर चारही बाजूंनी आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर माध्यमांशी बोलतांना गंभीर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
यावेळी बोलतांना राऊत म्हणाले की,” आमदार सुरेश धस डिल झाल्याशिवाय ज्या वेगाने पुढे गेले , ज्या वेगाने त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीने त्यांनी काही कागद आणि पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला, असे त्यांनी म्हटले. तसेच मुंडे भेटीवर बोलतांना राऊतांनी म्हटले की,”आपण कोणाला भेटायला जात आहोत आणि आपण कोणासाठी भेटलो. आपण कालपर्यंत कोणासाठी लढत होतो याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं”, असे म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी धसांवर शाब्दिक हल्लाबोल केला.
पुढे ते म्हणाले की,” भाजप प्रदेशाध्यक्ष व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) त्यांचे बॉस आहेत, असे धस म्हणतात. देवेंद्र फडणवीस देखील त्यांचे बॉस आहेत. मग त्यांच्या बॉसने त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? असा चिमटाही यावेळी राऊत यांनी काढला. इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी या विषयावर कोणाला भेटायला जावो हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचे आहे. ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्याच क्षणी बैठकीतून बाहेर पडले पाहिजे याला नैतिकता म्हणतात. हे सांगायला पाहिजे होत. परंतु, धस यांची हे सांगायची हिंमत आहे का?”, असा सवालही संजय राऊत यांनी विचारला.
तसेच मला एका प्रमुख माणसाने (Man) सांगितलं की, “आमदार सुरेश धस माघार घेतील, त्यांची ती परंपरा आहे. एखादी मोठी डील पदरात पाडून घेतील आणि ते नंतर शांत बसतील. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक फार मोठी डील झाली आहे”, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. त्यानंतर आता खासदार राऊतांच्या या आरोपाला आमदार सुरेश धस काय उत्तर देतात, हे बघणे महत्वाचे असणार आहे.