लासलगाव | वार्ताहर Lasalgaon
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज संसद भवन परिसरात कांद्याची माळ गळ्यात घालून सात खासदारांनी जोरदार आंदोलन केले.
आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती, देशांतर्गत बाजारात पडलेले भाव, अवकाळी पाऊस व गारपीटीच्या संकटामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा अशी प्रमुख मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.
केंद्र सरकारच्या आयात – निर्यात धोरणात प्रचंड अनियमितता आहे, यात नियमितता आणावी. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव लागू करावा. कांदा निर्यातीवरील बंधने काढून निर्यात वाढीसाठी धोरण आखावे. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणे योग्य दरात द्यावीत. नाफेड व एनसीसीएफ च्या माध्यमातून झालेल्या खरेदी प्रक्रियेची सीबीआय चौकशी करावी या प्रमुख मागण्या मांडल्या.
यावेळी खा .भास्कर भगरे, खा. बजरंगबाप्पा सोनवणे, खा. शोभाताई बच्छाव, खा. बाळूमामा म्हात्रे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, खा.निलेश लंके यांनी आंदोलनात सहभाग घेतला.





