राहुरी । तालुका प्रतिनिधी
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी लक्षणीय वाढली आहे. त्यामुळे, धरणातून नदीपात्रात पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, सध्या १३,००० क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे.
गेल्या काही दिवसांपासून धरणातील विसर्ग थांबवण्यात आला होता. मात्र, पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढली. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सुरुवातीला ५०० क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर पावसाचा जोर आणि पाण्याची आवक पाहता, विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली. पहाटे ५.३० वाजता ४,००० क्यूसेक, सकाळी ९.३० वाजता १०,००० क्यूसेक आणि दुपारी ३ वाजता १३,००० क्यूसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला आहे.
मुळा धरणात सध्या २५,९७५ दशलक्ष घनफूट (दलघफू) पाणीसाठा उपलब्ध असून, कोतूळ पाणलोट क्षेत्रातून ९७५ क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे. आजपर्यंत मुळा धरण परिसरात एकूण ५१८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धरणातून सुरू असलेल्या या मोठ्या विसर्गामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या १३,००० क्यूसेकने सुरू असलेला विसर्ग हवामान आणि पाण्याची आवक पाहून कमी किंवा जास्त केला जाऊ शकतो, असे धरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला असून, त्यांनी नदीपात्रात किंवा किनारी भागात जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





