मुंबई | Mumbai
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रभरात मुसळधार पावसाने (Hevay Rain) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडल्यामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते खचणे, झाडे कोसळणे यांसारख्या दुर्घटना समोर येत आहेत. दरम्यान, मुंबईतील परिस्थिती अधिक गंभीर बनली असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी (MMR) ‘ऑरेंज अलर्ट’ बदलून आता ‘रेड अलर्ट’ (अतिवृष्टीचा इशारा) जारी केला आहे. या काळात ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वाहतूक यंत्रणा कोलमडली
गेल्या आठवड्याभरापासून आणि विशेषतः शनिवार-रविवार झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि उपनगरातील (Mumbai and Upnagar) वेग मंदावला आहे. आज सोमवार असूनही पावसाचा जोर कायम असल्याने रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक महामार्गांवर दरडी कोसळल्याने आणि पुलांवर पाणी आल्याने प्रशासनाकडून वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्यात आली आहे.
रायगड जलमय; नद्यांनी ओलांडली धोकापातळी
गेल्या २४ तासांपासून रायगड जिल्ह्यात (Raigad District) पूरपरिस्थिती कायम आहे. सावित्री, कुंडलिका, अंबा आणि पाताळगंगा या प्रमुख नद्या अत्यंत धोकादायक पातळीवरून वाहत आहेत. महाड, रोहा, नागोठणे, पेण आणि खोपोली शहरांमध्ये रात्रभर पुराचे पाणी साचले होते. आज सकाळी पाण्याची पातळी काही प्रमाणात ओसरली असली, तरी संपूर्ण रायगड जिल्हा जलमय झाला आहे.
मुंबईत ३६ तासात ४०० पेक्षा जास्त झाडे कोसळली
मुंबई महापालिकेकडे झाडे आणि झाडांच्या मोठ्या फांद्या कोसळण्याच्या ४०० पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. चेंबुर, कुर्ला, आरे कॉलनीत झाडे कोसळून बळी गेल्यानंतरही पालिकेचा भोंगळ कारभार सुरुच आहे. झाडांचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश असतांनाही धोकादायक झाडांची मुंबईकरांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे.
१५ हजार कर्मचारी ‘ऑन ग्राउंड’; पालिकेचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह (BMC) विविध यंत्रणांचे सुमारे १५ हजार अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र ‘ऑन ग्राउंड’ कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारी स्वतः नियंत्रण कक्षातून प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
संभाव्य धोका लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत
१) घराबाहेर पडणे टाळा: अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये.
२) सुरक्षित अंतर राखा: झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब आणि इतर धोकादायक ठिकाणांपासून दूर राहा.
३) वाहन पार्किंग करताना काळजी घ्या: वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडण्याची शक्यता असल्याने झाडांखाली वाहने पार्क करू नका.
४) पर्यटन टाळा: समुद्रकिनारी, नदीकाठी तसेच पाणथळ भागात जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
५) अफवांवर विश्वास ठेवू नका: केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या सूचनांचेच पालन करा.
आपत्कालीन मदत क्रमांक
कोणत्याही आणीबाणीच्या किंवा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ (1916) या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा.




