Thursday, May 2, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार : ‘एक आरोपी एक पोलीस’ उपक्रम राबविणार

नंदुरबार : ‘एक आरोपी एक पोलीस’ उपक्रम राबविणार

शहादा । ता.प्र. – NANDURBAR

नंदुरबार पोलीस दलाचा ‘एक आरोपी एक पोलीस’ हा उपक्रम स्तुत्य असून हा उपक्रम राज्यात सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. दरम्यान, महिलांवर होणार्‍या अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी आणि गुन्हेगारांना लवकर कडक शिक्षा मिळावी यासाठी कडक कायदा करण्यात येईल.

- Advertisement -

तसेच सारंगखेडा येथील घटनेशी संबधित आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात नेण्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्यात येईल आणि त्यासाठी तज्ज्ञ वकीलाची नेमणूक करण्यात येईल, असेही ना.देशमुख यांनी सांगितले.

शहादा तहसिल कार्यालयात कोविड-19 आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड. के.सी.पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, खा. डॉ.हिना गावीत, आ.राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

श्री.देशमुख म्हणाले महिलावर होणार्‍या अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहे. अशा प्रकरणात गुन्हेगाराना कडक शिक्षा व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. सारंगखेडा येथील प्रकरणात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या तज्ज्ञ वकीलाचे सहकार्य घेण्यात येईल. त्यासाठी पोलीसांनी आवश्यक प्रस्ताव सादर करावा.

नंदुरबार हा सीमावर्ती जिल्हा असल्याने पोलीसावर अधिक जबाबदारी आहे. नवापूर आणि शहादा पोलीसस्टेशनचा प्रश्न लवकरमार्गी लावण्यात येईल. नंदुरबार पोलीसदलाचा ‘एक आरोपी एक पोलीस’ उपक्रम स्तुत्य असून हा उपक्रम राज्यात सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. कोरोना योद्ध्यांवर होणारे हल्ले दुर्देवी असून असे प्रकार करणार्‍या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

कोविडसारख्या संकटात जिल्हा प्रशासनाने चांगली कामगिरी केलेली आहे. जिल्ह्याने पालकमंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यापूर्ण उपक्रमही राबविले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना संसर्गाची परिस्थिती आटोक्यात आल्याचे दिसत असले तरी येत्या काळात दक्षता बाळगण्याची गरज आहे.

युरोपात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने परीस्थिती बिकट झाली आहे. हा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पोलीस दलाने कोरोनाकाळात चांगली कामगिरी केली असल्याचे श्री.देशमुख म्हणाले.

पालकमंत्री अ‍ॅड.पाडवी म्हणाले, जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचार्‍यांनी कोरोना प्रतिबंधाबाबत चांगली कामगिरी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील चांगले सहकार्य केले. पोलीस दलाने आपली भूमिका योग्यप्रकारे बजावली. पोलीसाच्या निवासाचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

महिला विषयक गुन्हे करणार्‍यावर कडक कारवाई झाल्यास समाजात चांगले संदेश जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधासाठी सर्वानी मिळून एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही अ‍ॅड.पाडवी म्हणाले.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील प्रश्नाविषयी चर्चा केली. जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी जिल्ह्यात केलेल्या उपाययोजनेबाबत आणि पोलीस अधीक्षक पंडीत यांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत सादरीकरण केले.

मास्क बनविणार्‍या बचतगटाचे कौतुक

गृहमंत्री श्री.देशमुख यांनी बैठकीपूर्वी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सरस्वती महिला बचत गट आणि ओमसाई महिला बचत गट यांनी तयार केलेल्या मास्क आणि इतर उत्पादनाची पाहणी केली. कोरोना संकटकाळात मास्क निर्मिती करुन प्रशासनाला चांगले सहकार्य केल्याबद्दल त्यांनी बचतगटाचे कौतुक केले. त्यांनी महिला बचतगटांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: मास्कची खरेदी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या