पुणे |प्रतिनिधी| Pune
पुणे (Pune) जिल्ह्यातील भोर (Bhor) तालुक्यातील नसरापूर (Nasarapur) येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, या प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी आता अत्यंत आक्रमक आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. माझ्या मुलीला जोपर्यंत योग्य तो न्याय मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय व्यक्तीने (Political Leder) आमच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी किंवा आम्हाला भेटण्यासाठी येऊ नये, असा ठाम निर्णय त्यांनी व्यक्त केला आहे. राजकीय पुढारी केवळ स्वतःचे राजकारण साधण्यासाठी आणि प्रसिद्धीसाठी येतात, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
पीडित पित्याने आपली व्यथा मांडताना सांगितले की, अनेक राजकीय नेते अशा घटनानंतर सांत्वनासाठी येतात, मात्र त्यांचा मुख्य उद्देश फोटो काढून घेणे आणि स्वतःचे राजकारण चमकवणे हाच असतो. ”राजकीय लोक येतात, फोटो काढतात आणि निघून जातात, परंतु आम्हाला आमच्या दुःखात सोडून देतात”, अशा शब्दांत त्यांनी आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे. जोपर्यंत त्या नराधमाला फाशीची शिक्षा (Hanging Punishment) सुनावली जात नाही, तोपर्यंत एकाही राजकारण्याने आमच्या घरी पाऊल ठेवू नये, ही माझी नम्र विनंती असल्याचे त्यांनी नमूद केले. एकदा का त्या गुन्हेगाराला फासावर लटकवले गेले की मगच ज्यांना आम्हाला भेटायचे असेल, त्यांनी खुशाल यावे, तोपर्यंत कोणाच्याही भेटीची आम्हाला गरज नाही, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे.
या संपूर्ण प्रकरणावर खासदार मेधा कुलकर्णी (MP Medha Kulkarni) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पीडित पित्याच्या भूमिकेचे समर्थन करताना म्हटले आहे की, वडिलांची ही उद्विग्नता अत्यंत समजण्यासारखी आहे. अशा प्रकारच्या दुर्दैवी घटनांच्या ठिकाणी प्रसिद्धी मिळवणे किंवा फोटो काढणे हे अत्यंत चुकीचे असून, तिथे अशा गोष्टींची अजिबात गरज नाही. या घडीला न्यायासाठी जे काही करता येईल, त्याचा तपशील पाहणे आणि संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावून गुन्हेगाराला शिक्षा मिळवून देणे हेच सर्वात महत्त्वाचे काम असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.





