मुंबई | Mumbai
दादरमधील कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरुन सध्या मुंबईत जोरदार वाद पेटला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील ५१ कबुतरखान्यांच्या परिसरात पक्ष्यांना खायला घालू नये, असे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही काही जैन व्यक्तींकडून कबुतरांना दाणे टाकले जात आहेत. या लोकांवर पोलिसांनी कारवाई ही केली आहे. तरीही काही लोकांनी न्यायालयाच्या आदेशाला हरताळ फासत कबुतरांना खायला घालणे सुरुच ठेवले आहे. याच पार्श्वभुमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी घातलेल्या टी-शर्टची जोरदार चर्चा सुरु आहे.
संदीप देशपांडे हे दादर परिसरात हा टी-शर्ट परिधान करुन फिरत होते. या टी-शर्टवर, ‘नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं!’, असा मजकूर लिहला आहे. हा टी-शर्ट म्हणजे एकप्रकारे मुंबईत राहून मुजोरीची भाषा करणाऱ्या अमराठी भाषिकांना अप्रत्यक्ष इशारा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना दादर कबुतरखाना बंद करण्याच्या मुद्द्यावरुन आक्रमक होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दादर कबुतरखाना बंद ठेवण्याचे निर्देश कायम ठेवल्यानंतर काही स्थानिक नागरिकांची कबुतरांना दाणे टाकायचे अजूनही बंद केलेले नाही. लालबागमध्ये राहणाऱ्या महेंद्र संकलेचा या व्यक्तीने आपली कार दादर कबुतरखान्याच्या परिसरात नेऊन एक ट्रे गाडीच्या टपावर ठेवला होता. जेणेकरुन कबुतरांना खाणे मिळेल. आम्ही अशा आणखी १२ गाड्या आणणार आहोत. न्यायालयाने कबुतरखान्यात दाणे टाकायला मनाई केली आहे. मी गाडीच्या टपावर ट्रे ठेऊन कबुतरांना खायला घालत आहे, अशी उर्मटपणाची भाषा महेंद्र संकलेचा याने केली होती. यानंतर पोलिसांनी त्याची गाडी जप्त करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकारानंतर दादर कबुतरखाना ट्रस्टने हात झटकले आहेत.
न्यायालयाच्या निर्देशानंतर दादर कबुतरखाना ट्रस्टकडून जागोजागी फलक लावले आहे. कबुतरांना कोणीही धान्य खायला घालू नये असे आवाहन केले आहे. कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार राहणार नसल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे. तसेच महानगरपालिकेकडे याबाबतच्या परवानगीची विनंती ही केली असून, महापालिकेने सकाळी सहा ते आठ या वेळेत धान्य घालण्यास मौखिक परवानगी दिली आहे. मात्र, ती अद्याप लेखी स्वरुपात दिली नाही. त्यामुळे नागरिकांनी न्यायालयाच्या निर्देशाचा सन्मान करावा असे ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे.
एकीकडे दादर कबुतरखाना येथील पक्षांचा प्रश्न ऐरणीवर असताना दुसरीकडे गिरगाव परिसरातील कबूतरखाना येथे देखील पक्षांची संख्या वाढल्याचे पाहिला मिळत आहे. कोर्टाने मुंबईतील कबूतरखान्या संदर्भात नुकतेच निर्देश देताना नागरिकांच आरोग्य महत्वाच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका गिरगाव चौपाटी येथील कबुतरखान्या संदर्भात पालिका काय पावले उचलणार, याकडे पक्षीप्रेमींच लक्ष लागले आहे.




