नवी दिल्ली | New Delhi
देशातील आसाम, केरळ आणि पुदुचेरी या तीन राज्यांमधील विधानसभेच्या २९६ जागांसाठी आज मतदान (Voting) पार पडत आहे. सकाळी सात वाजेपासून मतदानास सुरुवात झाली असून, सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत आसाममध्ये १७.८७ टक्के, केरळमध्ये १६.२३ टक्के आणि पुदुचेरीत १७.२३ टक्के इतके मतदान झाले आहे. त्यामुळे सायंकाळपर्यंत हा मतदानाचा आकडा अजून वाढताना दिसणार आहे.
आसाममध्ये (Assam) ४१ पक्षांचे ७२२ उमेदवार १२६ जागांसाठी निवडणूक लढवत आहेत. तर केरळमध्ये, २.७१ कोटी मतदार ८९० उमेदवारांमधून आपल्या नेत्याची निवड करणार आहेत. तसेच पुदुचेरीमध्ये २० पक्षांचे २९४ उमेदवार निवडणूक लढवत असून, या तिन्ही राज्यांमध्ये १० लाखांहून अधिक मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील. दरम्यान, या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीव्यतिरिक्त आज (गुरुवारी) कर्नाटकातील दोन, नागालँडमधील एक आणि त्रिपुरातील एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. तर गोव्यातील एका जागेसाठी पोटनिवडणूकही नियोजित होती, परंतु उच्च न्यायालयाने तेथील पोटनिवडणुकीला स्थगिती दिली आहे.
आसाममध्ये १२६ जागांवरील ७२२ उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी ३१ हजार ९४० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.आसामधील ३५ जिल्ह्यांमध्ये शांततापूर्ण मतदान सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोगाने दीड लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. तर केरळमधील (Kerala) सर्व १४० जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडत असून, आज एकूण ८८३ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. केरळातील २.७१ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याशिवाय पुदुचेरीतील (Puducherry) ९.५० लाख मतदार २९४ उमेदवारांचे भवितव्य मतदानाच्या माध्यमातून ठरवणार आहेत.





