नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहर पोलीस आयुक्तालयाच्या (Nashik City Police Office) मुख्य प्रवेशद्वारासमोर १७ फेब्रुवारी रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातातील दुसऱ्या जखमी तरुणाचाही (Youth) मृत्यू झाला आहे. आधीच मित्र समाधान देवरे याचा जागीच मृत्यू झालेला असताना, मृत्यूशी झुंज देणाऱ्या सुजित राय (२९) यानेही रविवारी (दि. २२) अखेरचा श्वास घेतला. एकाच अपघातात दोन उमद्या तरुणांचा बळी गेल्याने हॉटेल व्यावसायिकांसह नाशिककरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
गंगापूर रोडवरील हॉटेल करिलिव्हज् (जेहान सर्कल) येथे कामाला असलेले समाधान रवींद्र देवरे (३२) आणि सुजित राय (२९) हे १७ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून अशोकस्तंभाकडे जात होते. भरधाव असलेल्या त्यांच्या दुचाकीला आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या रस्ते कामाच्या साहित्याचा आणि धोकादायक वळणाचा अंदाज आला नाही. परिणामी, दुचाकी थेट दुभाजकाला धडकून विजेच्या खांबावर आदळली. या भीषण धडकेत समाधान १० ते २० फूट फरफटत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
अपघातात (Accident) सुजित राज (वय २९, रा. हॉटेल करिलिव्हज्, मूळ रा. प. बंगाल) याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयातून आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले होते. मात्र, मेंदूला गंभीर इजा झाल्याने त्याची प्रकृती खालावत गेली. अखेर २२ फेब्रुवारी रोजी सकाळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद असून पोलीस हवालदार जाधव तपास करत आहेत.
प्रशासनाच्या बेफिकिरीवर प्रश्नचिन्ह?
शहरातील २९ रस्त्यांसह पोलीस आयुक्तालयासमोरच रस्ते कामांचा सावळागोंधळ सुरू आहे. रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य, सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आणि दिशादर्शक फलक नसणे हे या अपघाताला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, वाहन चालकांचा अतिवेगही त्यांच्या जीवावर बेतले आहे. आता या दोन मृत्यूंना जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.





