सटाणा | Satana
भरधाव एसटी बस (ST Bus) दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident) दुचाकीस्वार तीन जण जागीच ठार झाले. साक्री-शिर्डी महामार्गावर (Sakri-Shirdi Highway) बनोली शिवारात काल सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील मृत दोघे युवक सख्खे भाऊ आहेत. अपघातानंतर ताहाराबाद-सटाणा रोडवर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली हाती.
अपघातात विकी दयाराम माळी (१९), रोशन दयाराम माळी (२८) आणि गोविंद काळू पवार (३८, तिघे रा. सुकडनाला परिसर) ही मृत्यूमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. विकी आणि रोशन हे दोघेही सख्खे भाऊ आहे. या घटनेने सटाणा शहरात (Satana City) हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेची समजलेली माहिती अशी की, सटाणा शहरालगत असलेल्या सुकड नाला परिसरातील, आदिवासी कुटुंबातील विकी माळी, रोशन माळी व गोबिंद पवार हे तिघे जण सटाणा येथून ताहाराबादकडे दुचाकी (क्र. एम.एच.-४१-बी.एस.-४१२४) ने जात असतांना नंदुस्वार येथून बसईकडे जाणाऱ्या बस (क्र. एम. एच.१४-एल. एक्स ८८४९) ही ताहाराबाद येथून सटाण्याकडे भरधाव जात असतांना बनोली शिवारात भरधाव दुचाकी बसवर चालक बाजूने जावून धडकली.
दोन्ही वाहने वेगात असल्याने धडक बसल्यानंतर दुचाकी बसच्या पुढील चाकाजवळ घुसून काही अंतर पुढे फरफटत गेली. दोन्ही वाहने वेगात असल्याने बसवर दुचाकी आदळताच तिघे दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी होवून जागीच गतप्राण झाले. बसवर दुचाकी धडकल्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक (Citizen) घटनास्थळी धावून आले. घडलेली घटना इतकी भयानक होती की अपघातस्थळी अक्षरशः रक्तमासाचा पडलेला सडा उपस्थितांना हादरून सोडणारा ठरला होता.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पाटील, सपोनि दत्तात्रय राऊत, सुधीर साप्ते, बाळासाहेब टिळेकर, निंचा खैरनार, योगेश पवार, सिकंदर कोळी, किशोर सूर्यवंशी, नितीन जगताप यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहांना रूग्णवाहिकेतून तात्काळ शासकीय रुग्णालयात (Government Hospital) हलवित घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा होवून दोन्ही बाजुने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांना वाहतूक सुरळीत करताना मोठी कसरत करावी लागली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
राज्य महामार्ग मृत्यूचा सापळा
गेल्या काही महिन्यांपासून विंचूर-प्रकाशा या राज्य महामार्गावर सातत्याने घडत असलेल्या अपघातात अनेकांचा बळी जावून काही जण गंभीररित्या जखमी झाल्याने जायबंदी झाले आहेत. मृतांमध्ये अधिकाधिक दुचाकीस्वारच आहे. वेगावर नियंत्रण नसणे तसेच व्यसन व रस्त्याची निर्मिती करतांना ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक अथवा गतीरोधकाची निर्मिती करण्यात न आल्याने वाहने राज्य महामार्गावरून वेगात चालक नेत असल्याने एखाद्या वाहन चालकाच्या चुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे या राज्य महामार्गावर गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्गाप्रमाणेच स्पिड नियंत्रण उपाययोजना करावी. तसेच अपघाती क्षेत्रात गतीरोधक व दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी अपघातात तीन युवक जागीच ठार झाल्याने घटनास्थळी जमलेल्या संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी केली.





