पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik APMC) पंचवटी येथील भाजीपाला मार्केटयार्डमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वाढता वावर चिंताजनक ठरत असून, शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. २६ मार्च रोजी शेतकरी सुनील गांगुर्डे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर बाजार समिती प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सभापती कल्पना चुंभळे यांच्यासह संचालक मंडळाने पंचवटी पोलीस ठाण्याचे (Panchvati Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांची भेट घेत, मार्केटयार्डमधील गुंडांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली.
नाशिक बाजार समितीत जिल्ह्यासह परराज्यातील शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात आपला माल विक्रीसाठी आणतात. त्यामुळे मार्केटयार्ड परिसरात दिवस-रात्र वर्दळ असते.मात्र, अलीकडील काळात येथे गुंड प्रवृत्ती सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शेतकरी माल विकून परतत असताना त्यांना अडवून मारहाण करणे, रोख रक्कम व मोबाईल हिसकावणे, तसेच व्यापाऱ्यांकडून हप्त्याची मागणी करणे अशा प्रकारांमध्ये वाढ झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.भीतीपोटी अनेकजण तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचा गैरफायदा गुन्हेगार घेत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दहशतीचे वातावरण संपवा!
मार्केटयार्डमध्ये शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लूटमार व धमकावण्याच्या घटना वाढत आहेत. पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून गुन्हेगारी मोडीत काढावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,” असा इशारा सभापती कल्पना चुंभळे (Kalpana Chumbhale) यांनी दिला.
पोलिसांकडे ठोस मागण्या
माजी सभापती शिवाजी चुंभळे, उपसभापती जगन्नाथ कटाळे, संचालक धनाजी पाटील, विनायक माळेकर तसेच सचिव निवृत्ती बागुल यांनीही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली. यापूर्वी दि. १५ जुलै २०२५ रोजीही या संदर्भात निवेदन देण्यात आले होते, याची आठवण करून देत प्रशासनाने २६ मार्चच्या घटनेनंतर शेतकरी वर्गात तीव्र संताप असल्याचे नमूद केले.
मार्केटयार्ड परिसरात २४ तास पोलीस गस्त वाढविणे, संशयित गुंडांची तात्काळ धरपकड करणे, कडक कायदेशीर कारवाई करणे, तसेच शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.




