नाशिक | Nashik
ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नाशकात आज (गुरुवारी) सकाळपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह यतीन वाघ,माजी नगरसेवक संजय चव्हाण आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला. या सर्व गोंधळात मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील हे देखील आपल्या समर्थक माजी नगरसेवकांसह भाजप कार्यालयात दाखल झाले. यानंतर या सर्वांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाट्यमयरित्या पक्षप्रवेश पार पडला.
आमदार फरांदे यांचा पक्षप्रवेशाला विरोध
नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह यतीन वाघ,माजी नगरसेवक संजय चव्हाण आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे यांच्या पक्षप्रवेशाला जोरदार विरोध दर्शविला आहे. तसेच त्यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे. तर फरांदे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत त्यामध्ये “प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला माझा स्पष्ट विरोध आहे. तसेच प्रस्थापितांच्या विरोधात ठामपणे लढा देणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मी खंबीरपणे पाठीशी आहे. सदर विषयाबाबत निवडणूक प्रमुख म्हणून मला कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही”, असं म्हटले आहे. यामुळे नाशिकमधील भाजपची अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे.
विनायक पांडे नेमकं काय म्हणाले?
माध्यमांशी बोलतांना विनायक पांडे म्हणाले की, “मागच्या निवडणुकीत तिकिटाच्या वेळी माझ्या मुलाचे तिकीट कापले. आता पुन्हा मुलाच्या उमेदवारीची मागणी केली होती. पंरतु, त्यांच्याकडून सूनबाईला निवडणुकीत उतरविण्यास सांगण्यात आले. त्यादृष्टीने आम्ही सूनबाईला निवडणुकीत उतरवले. आता आम्ही मनसे आणि शिवसेनेचा सुफडा साफ करणार आहोत. संजय राऊत यांच्यासोबत मी फोनवर चर्चा केली, पण त्यांनी उमेदवारीबाबत काही ठोस सांगितले नाही. तरुण पिढीला आता पुढे नाही आणायचे तर मग कधी? माझी पक्षातील कोणावरही नाराजी नाही. मात्र, आज आम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत”, असे त्यांनी म्हटले होते.
दिनकर पाटील काय म्हणाले?
मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना ‘प्रभागाचा विकास करण्यासाठी भाजपमध्ये चाललो आहोत’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. दिनकर पाटील पूर्वी भाजपमध्ये होते. परंतु, विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी निवडणूक देखील लढवली होती. मात्र,भाजपच्या सीमा हिरे यांनी त्यांचा पराभव केला होता. यानंतर आज ते पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.





