नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात खळबळ उडवून देणाऱ्या विसे मळा गोळीबार आणि अपहरण प्रकरणातील (Firing Case) संशयितांना अखेर दिलासा मिळाला आहे. भाजप नेते सुनील बागूल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय दिलीप बागूल याच्यासह अन्य दोन संशयितांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) जामीन मंजूर केला आहे. यामुळे आतापर्यंत एकूण चार संशयित कारागृहाबाहेर आले असून, उर्वरित संशयितांनी जामिनासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत.
२९ सप्टेंबरच्या पहाटे रामवाडी ते गंगापूर रोड (Ramwadi to Gangapur Road) या मार्गावर सचिन अरुण साळुंके (२८) या तरुणाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. यात गोळीबार करून संशयित थांबले नाहीत, तर त्यांनी साळुंकेचे अपहरण केले होते. त्यानंतर, ‘कायद्याचा बालेकिल्ला’ या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी या टोळीवर कारवाई केली होती. दरम्यान, या गुन्ह्यात सरकारवाडा पोलिसांनी अजय बागूल, सचिन कुमावत आणि दीपक जाधव यांना अटक केली होती.
त्यापूर्वीच सागर बागूल, गौरव बागूल, प्रेमकुमार काळे, वैभव उर्फ विकी काळे, मामा उर्फ बाबासाहेब राजवाडे, अमोल पाटील आणि संदीप शेळके यांना बेड्या ठोकल्या होत्या. फेब्रुवारी महिन्यात संशयित सागर सुधाकर बागूल याला सर्वात आधी जामीन मंजूर झाला होता तर, आता अजय दिलीप बागूल, दीपक उर्फ पप्पू राजेंद्र जाधव आणि अमोल भास्कर पाटील यांना उच्च न्यायालयाने जामीन (Bail) मंजूर केला आहे.
निमसेंच्या सुनावणीकडे लक्ष
एकीकडे विसे मळा प्रकरणातील संशयित बाहेर येत असताना, दुसरीकडे भाजपच्या अन्य नेत्यांच्या जामीन अर्जाकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पंचवटीतील गोळीबार प्रकरणातील संशयित माजी नगरसेवक जगदीश चिंतामण पाटील यांना फेब्रुवारीअखेरीस अटी-शर्तीसह जामीन मिळाला आहे. तर, खुनाच्या गुन्ह्यात नोव्हेंबर २०२५ पासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात असलेले माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा जामीन अर्ज सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यांच्या अर्जावर २० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.





