नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मराठी भाषा (Marathi Language) आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी चौथे विश्व मराठी संमेलन २७ फेब्रुवारी ते १ मार्च यादरम्यान नाशिकच्या (Nashik) के.टी.एच.एम. महाविद्यालय प्रांगणात रंगणार आहे.
संमेलनाची सुरुवात आज (दि. २६) रोजी सकाळी ८:३० वाजता मराठी बोली महोत्सवाने झाली आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि.२७) दुपारी ३ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन होणार असून, यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा अजित पवार व मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहतील. या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र श्रीनिवास नेमाडे (साहित्यभूषण), विनायक कुलकर्णी (विंदा करंदीकर जीवनगौरव) आणि मारुतीबाबा कुरेकर यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित केले जाईल.
दरम्यान, संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत (Uday Samant) आणि स्वागताध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांनी नाशिककरांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तीन दिवसांच्या या सोहळ्यात परिसंवाद, काव्यवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल युगात मराठीचा वापर वाढवणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. जागतिक स्तरावरील मराठी बांधवांना एकत्र आणणाऱ्या या सोहळ्यामुळे नाशिकच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे.




