नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सातपूर (Satpur) येथील बारबाहेर झालेल्या गोळीबारानंतर (Firing) आता मागील आठवड्यातही गंगापूर रोड भागात ‘सिनेस्टाइल’ गोळीबार झाला. या प्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांसह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा नोंद झाला आहे. मागील वादातून एका तरुणाचे अपहरण (Kidnapping) करीत त्याच्या व मित्राच्या दिशेने गोळी झाडून बेदम मारहाण केल्याचा थरार २९ सप्टेंबरच्या पहाटे घडला असून, सराईत तुकाराम दत्तू चोथवे व अजय जेठालाल बोरिसा यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ज्या कारवर गोळीबार झाला ती कारही युनिट एकने ताब्यात घेतली आहे.
राणेनगरात (Rane Nagar) राहणाऱ्या सचिन अरुण साळुंके (वय २८) याने सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली असून तो वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. यापूर्वी तो रामवाडी जवळील आदर्शनगरात वास्तव्यास होता. २९ सप्टेंबर रोजी पहाटे त्याच्यावर गोळी झाडून अपहरण करीत मारहाण करण्यात आली. या हल्ल्यानंतर काही दिवसांनी साळुंकेने रविवारी (दि. ५) रात्री उशिराने पोलिसांत धाव घेतली. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ८ वाजता साळुंके व शालक ऋषिकेश जाधव दांडिया खेळण्यासह पाहण्यासाठी निघाले. मित्र सचिन सांगळे व हरिश साळुंके यांना फोन करुन ‘दांडिया खेळण्यासाठी उपनगरकडे जात आहोत. तुम्ही पण या’, असे ते म्हणाले.
यानंतर चौघेही टाकळी परिसरात गरबा खेळून रात्री ९.३० वाजता जेवणासाठी गंगापूररोडकडे निघाले. रात्री १०.३० ते मध्यरात्री १२.३० पर्यंत गंगापूररोडवरील (Gangapur Road) एका पार्किंगमध्ये बसून त्यांनी ‘गप्पा’ केल्या. त्यानंतर गोदावरी नदीचा पूर बघण्यासाठी चौघे निघाले. हरिशला उशीर होत असल्याने अशोकस्तंभावर सोडून तिघेही संत गाडगे महाराज पुलावर पोहोचले. २९ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजता तिघेही गणेशवाडी, काट्या मारुती चौक, दिंडोरी नाकामार्गे रामवाडीत पोहोचले. साळुंकेला जुन्या घराची आठवण आल्याने रामवाडीजवळ तिघे थांबले. तेव्हा संशयित बोरिसा व चोथवे तेथे उभे होते. त्यांनी साळुंके कडे रागाने बघितल्यावर तिघेही निघून गेले.
रामवाडीतून (Ramwadi) तिघेही पहाटे १.३० वाजता विसे चौकात पोहोचले. कार थांबवून सचिन साळुंके लघुशंका करीत असताना भरधाव वेगाने दोन कार तेथे पोहोचल्या. त्यातून चोथवे आणि बोरिसा यांच्यासोबत आणखी १०-१२ जण होते. बोरिसाने साळुंकेचा गळा दाबून ‘मला खुन्नस देतो का? इथे कशाला आला, मला ठार मारायला आला का? तुझी येथे येण्याची हिम्मत कशी झाली, तुला संपवून टाकतो’, असे म्हणाला. बोरिसाने गावठी कट्ट्यातून साळुंकेच्या दिशेने दोन वेळा गोळी झाडली. तेव्हा झटापट करुन साळुंकेने जीव वाचवला. फायरिंगमुळे सांगळे कार घेऊन निघू लागला. ‘याचा ड्रायव्हर पळत आहे’, असे म्हणत बोरिसाने सांगळेच्या दिशेने झाडलेली गोळी कारच्या डिक्कीला लागली.
बोरिसा व साथीदारांनी साळुंकेला बळजबरीने त्यांच्या कारमध्ये बसवले, सांगळे व जाधव यांनी त्या कारचा पाठलाग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. तर, केटीएचएम कॉलेजसमोरील (KTHM Collage) पूलापर्यंत पोहोचल्यावर सांगळे कारमधून उतरून पसार झाला. तेव्हा बोरिसाच्या साथीदारांनी कार रामवाडीत आणली. तेथे ‘जिवंत सोडू नका’, असे म्हणत चोथवेसह इतरांनी साळुंकेवर वार केले. जाधवलाही मारहाण केली. पहाटे ३.३० वाजता जखमींना नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास युनिट एकचे पथक करत आहेत.
त्या’ नेत्यासह कार्यकर्त्यांना इशारा…
या गोळीबारानंतर पोलिसांनी तपास केला असता, त्यात शिवसेना उबाठा गटातून नुकतेच भाजपत प्रवेश करताना वेटींग करावी लागलेल्या पंचवटीतील एका नेत्याची शहर पोलिसांनी सोमवारी गुन्हेशाखेत चौकशी केली. तसेच, काही बाबींवर बोट ठेऊन या नेत्यास पोलिसांनी सूचक इशारा दिला, असे समजते.
तेव्हा बोरिसावर गोळीबार
चोथवेवर २०१६ पासून गुन्हे असून कारागृहात स्थानबद्ध राहूनही त्याच्यात सुधारणा झाली नाही. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी आदी गुन्हे दाखल आहेत. सध्या तो जामिनावर आहे. तर, बोरिसा याच्यावर खून, बेकायदेशीर जमाव, मारहाण, खुनाचे प्रयत्न, शस्त्र बाळगणे, बलात्कार आदी गंभीर स्वरुपाचे आठ हून अधिक गुन्हे नोंद आहेत. भेळविक्रेता सुनील वाघ याच्या हत्येत संशयित होता. अपहरण करीत तरुणीवर बलात्कार केल्याबाबत गुन्हा नोंद असून त्याचे कुटुंब महानगरपालिकेतील सफाई कामगार आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये मालेगाव स्टॅन्ड पोलीस चौकीबाहेर भूषण लोंढे व टोळीने केलेल्या गोळीबारात बोरिसा बालंबाल बचावल्याची चर्चा आहे.





