नाशिक | Nashik
विकासकामांचे थकीत बिल मंजूर करून देण्यासाठी ५ टक्के कमिशनच्या स्वरूपात ४८ हजार रुपयांची लाच (Bribe) स्वीकारल्याप्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Nashik Anti-Corruption Bureau) इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) धारगाव ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक, सरपंचाचे पती आणि एका खाजगी इसमाला रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी धारगाव ग्रामपंचायतीअंतर्गत ई-निविदा प्रक्रियेद्वारे नळपुरवठा योजना, सार्वजनिक शौचालय आणि भूमिगत गटार अशी सुमारे १३ लाख ७० हजार रुपयांची ६ विकासकामे यशस्वीपणे पूर्ण केली होती. यापैकी ५ कामांचे ९ लाख ७० हजार रुपयांचे बिल ठेकेदाराला मिळाले होते. मात्र, उर्वरित कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामसेवक बाळू अंतु मांगटे (वय ४५) याने ५ टक्के कमिशनप्रमाणे ४८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ‘लाच न दिल्यास उर्वरित बिल मंजूर होणार नाही,’ अशी धमकीही त्याने दिली.
यानंतर लाचेच्या या मागणीला कंटाळून ठेकेदाराने (Contractor) १३ जुलै २०२६ रोजी नाशिक एसीबीकडे अधिकृत तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने पंचांच्या समक्ष पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २८ जुलै रोजी पथकाने घोटी परिसरात (Ghoti Area) सापळा रचला. या दरम्यान ग्रामसेवक बाळू मांगटे याने सरपंचांचे पती पांडुरंग देवराम पुंजारा (वय २३) यांना लाच स्वीकारण्यास प्रवृत्त केले. अखेर खाजगी इसम शांताराम सोनू पादीर (वय ३८) याच्यामार्फत ग्रामसेवकासाठी ४८ हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना संशयिताना पकडण्यात आले.
कायदेशीर कारवाई व पथक कामगिरी
या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात (Ghoti Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७, ७ (अ) व १२ अन्वये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे. ही यशस्वी कामगिरी एसीबीचे पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक, तसेच पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने पार पाडली. या कारवाईत सहायक पोलीस उपनिरीक्षक पंकज पळशीकर आणि पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके यांनी सहभाग घेतला.
नागरिकांना ‘एसीबी’चे आवाहन
तसेच एसीबीने नागरिकांना कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक किंवा त्यांच्या प्रतिनिधीने लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी न घाबरता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांकावर किंवा स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.




