नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सध्याच्या काळात उपवर मुलांसाठी मुली मिळणे किती कठीण झाले आहे, याचा गैरफायदा घेत काही गुन्हेगारी टोळ्यांनी (Gang) आता चक्क ‘लग्नाचा बाजार’ मांडल्याचे वास्तव नाशिकमध्ये समोर आले आहे. लग्न जमवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळायचे आणि अवघ्या काही दिवसांतच नववधूने दागिने-रोकड घेऊन पोबारा करायचा, अशी एक सुनियोजित ‘मोडस ऑपरेंडी’ चालवणारी आंतरजिल्हा टोळी नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी (Panchvati Police) उघडकीस आणली आहे.
एका ३४ वर्षीय व्यावसायिकाला अडीच लाखांना गंडा घालून लग्नाच्या अवघ्या पाचव्या दिवशी पळून गेलेल्या ‘लुटेरी दुल्हन’सह तिच्या सात साथीदारांवर गुन्हा (Case) दाखल झाला आहे. या घटनेने विवाह इच्छुक तरुणांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही टाेळी मुली मुलांकडच्या लोकांची मानसिकता ओळखल्यावर लग्न ठरवण्यापासून ते लग्न लावून देण्यापर्यंत या टोळीत प्रत्येकाची भूमिका ठरलेली हाेती. मुलाकडच्या लोकांची आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना जाळ्यात ओढले जात हाेते. तर, लग्न वेळेवर पार पाडण्यासाठी मामा, मावशी, आई अशी खोटी नाती उभी केली जात हाेती. शिवाय, लग्नाला कायदेशीर आणि सामाजिक स्वरूप देण्यासाठी वैदिक विवाह संस्थांमध्ये घाईघाईने लग्न लावले जात हाेते,असेही समाेर आले आहे.
प्रकरणात फसवणूक (Fraud) झालेल्या नवरदेवाने पैसे आणि पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या टोळीने त्यालाच ‘मुलीचे बरेवाईट केले’ असा खोटा आरोप लावून पोलिसात अडकवण्याची धमकी दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या टोळीची मुख्य सूत्रधार मंगल पठारे हिला पोलिसांनी अशाच एका प्रकरणात अटक केली. ही घटना जेव्हा पीडित नवरदेवाच्या वाचनात आली, तेव्हा त्याचे डोळे उघडले. आपल्यासोबत झालेला प्रकार हा कौटुंबिक वाद नसून एका मोठ्या टोळीचा कट होता, हे लक्षात येताच त्याने पंचवटी पोलिस ठाणे गाठले.
पाच दिवसांचा ‘संसार’ आणि…
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथील हसनापूर गावच्या एका ३४ वर्षीय व्यावसायिकाचे लग्न जमत नव्हते. याचाच फायदा मध्यस्थांनी घेतला. नाशिकच्या एका मुलीचे स्थळ सुचवून “लग्नासाठी अडीच लाख रुपये द्यावे लागतील,” अशी अट घातली. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी पंचवटीतील एका वैदिक विवाह संस्थेत संदीपचा विवाह ‘राणी सुखदेव पवार’ या तरुणीशी झाला. संदीपने रोख २ लाख रुपये आणि ५० हजारांचे दागिने मुलीला दिले. संसाराची स्वप्ने रंगवत असतानाच, अवघ्या पाचव्या दिवशी (१० ऑक्टोबर) ‘मामाच्या मित्राला भेटते’ असे सांगून राणी सिन्नर बस स्थानकातून रिक्षामध्ये बसली आणि परतलीच नाही. शोध घेतला असता तिचे तथाकथित नातेवाईक भाड्याचे घर खाली करून पसार झाल्याचे समाेर आले.
या ७ संशयितांवर गुन्हा
१. राणी सुखदेव पवार (नववधू)
२. मंगल अंकुश पठारे (मुख्य सूत्रधार)
३. भिवा भिमा माळी
४. मामा खंडू
५. संगीता खंडू दाते
६. लताबाई पवार
७. सोनाली




