नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) हद्दीतील साईप्रितम हॉटेलजवळ शनिवारी (दि. ३०) रात्री व्यावसायिकास मारहाण (Beating) करून त्याची सोनसाखळी आणि रोकड लांबविण्यात आली. मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या सामान्य नागरिकांनाही लुटारूंनी मारहाण केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवून चौघांपैकी तिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना (दि. १) पोलीस कोठडी सुनावली आहे.
फिर्यादी ललीत राजेंद्र कोल्हे (वय २५, रा. आव्हाड चौक, चेतनानगर, नाशिक) हे शनिवारी (दि. ३०) रात्री ११.३० ते ११.४५ च्या सुमारास आपल्या हिरो होंडा एचएफ डिलक्स मोटरसायकलने द्वारका येथून राणे नगरकडे जात होते. प्रवासादरम्यान ते साईप्रितम हॉटेलजवळ लघुशंकेसाठी थांबले असता, तोंडाला रुमाल बांधलेले चार अनोळखी संशयित (Suspected) त्यांच्याजवळ आले. त्यातील संशयित अरबाज बागवान, सोहिल पठाण, इम्रान शेखसह साथीदाराने कोल्हे यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यातील एकाने ललीत यांच्या पोटावर जोरदार लाथ मारली, ज्यामुळे ते खाली कोसळले. या हल्ल्यात त्यांच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली असून मनका फॅक्चर झाला आहे. ते खाली पडल्यानंतर संशयितांनी त्यांच्या खिशातील पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. पाकिटातील १४ ते १५ हजार रुपये आणि पँटच्या डाव्या खिशातील ३० हजार रुपये अशी एकूण पंचेचाळीस हजार रुपयांची रोकड बळजबरीने लुटली.
दरम्यान, झटापटीदरम्यान ललीत यांच्या गळ्यातील १ तोळा वजनाची सोन्याची साखळी तुटली, ती देखील लुटारूंनी पळवून नेली. याचवेळी ललीत यांना चाकू व सुऱ्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी (Death Threat) दिली. हा प्रकार पाहून घटनास्थळी काही नागरिक ललीत यांच्या मदतीसाठी धावले. मात्र, या गुंडांनी त्यांनाही बेदम मारहाण केली.
तिघेही सराईत
या गंभीर घटनेनंतर ललीत कोल्हे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या सूचनेने सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्यासह पथकाने कारवाई करत चौघांपैकी तिघा संशयितांना अटक केली आहे. चौघेही संशयित सराईत व बेरोजगार असून चौथ्या पसार संशयितांचा शोध सुरु आहे.




