घोटी | वार्ताहर |Ghoti
वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या (Wadivarhe Police Station) हद्दीतील एसएमबीटी (SMBT) मेडिकल कॉलेजबाहेर बेवारस अवस्थेत आढळलेल्या एका महिलेच्या मृत्यूच्या (Woman Death) प्रकरणाचा छडा वाडीवऱ्हे पोलिसांनी अत्यंत कौशल्याने अवघ्या १४ दिवसांत लावला आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यू वाटणाऱ्या या घटनेत तांत्रिक तपास, मोबाईल कॉल डिटेल्स आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हत्येचा कट उघडकीस आणत चार संशयित आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
कल्याण (Kalyan) येथील रहिवासी असलेल्या संगीता मारुती चंद्रशिखे या मंगळवार (दि.१४) रोजी घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत कळसेवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या हरवल्याची (मिसिंग) नोंद करण्यात आली होती. त्यानंतर १६ जुलै रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धामणगाव येथील एसएमबीटी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ पार्किंगलगत एका महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला व सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
तपासाची चक्रे फिरली अन् खूनाचा कट उघड झाला
मृत महिलेच्या ओळखपत्रावरून तिची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल्स (CDR/SDR), लोकेशन, सोशल मीडिया आणि तांत्रिक माहितीचा बारकाईने अभ्यास केला. या तपासात संगीता आणि मुख्य संशयित आरोपी दिगंबर आव्हाड यांच्यात २००४ पासून प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. दोघांमध्ये लग्नावरून वाद सुरू होते. शिवाय मालमत्तेचे व्यवहार, फ्लॅट स्वतःच्या नावावर करणे, मृत्युपत्र आणि कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेण्यावरून मतभेद निर्माण झाले होते. याच वादातून संशयित आरोपींनी १५ जुलै रोजी संगीता यांना नाशिकला बोलावले आणि एसएमबीटी कॉलेज परिसरात आणून त्यांचा खून केला. त्यानंतर अपघाताचा बनाव करण्यासाठी मृतदेह रुग्णालयाच्या गेटजवळ टाकून आरोपी पसार झाले.
चार आरोपी अटकेत
वाडीवऱ्हे पोलिसांनी याप्रकरणी चारही संशयितांना अटक केली आहे. दिगंबर आव्हाड (मुख्य संशयित), संतोष जाधव, तुषार रत्नपारखी आणि विनोद पांडे अशी आरोपींची नावे असून, त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकाचे कौतुक
अत्यंत गुंतागुंतीच्या या प्रकरणाचा अवघ्या १४ दिवसांत उलगडा केल्याबद्दल वाडीवऱ्हे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला एम., उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धीरज महाजन, अमंलदार मनोज येशी, विकास गिते, रामकृष्ण लहामटे, विशाल सोनवणे, श्रीश गांगुर्डे व पथकाने केली.




