चांदवड | वार्ताहर | Chandwad
तालुक्याच्या आठवडे बाजारात (Weekly Market) गर्दीचा (Crowd) फायदा घेत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून चोरून नेणाऱ्या दोन महिला चोरट्यांना (Female Thieves) चांदवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेली दिड तोळ्याची सोन्याची पोत हस्तगत केली आहे. अवघ्या चार दिवसांत गुन्ह्याचा छडा लावून पोलीसांनी केलेली ही कामगिरी कौतुकास्पद ठरत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार (दि.१४ जुलै) रोजी सायंकाळी ६ वाजता चांदवड शहरातील आठवडे बाजारात संगिता भालचंद्र क्षत्रिय (रा. श्रीराम रोड, चांदवड) ही महिला खरेदी करत असताना गर्दीचा फायदा घेऊन दोन अज्ञात महिलांनी गळ्यातील दिड तोळ्याची पोत हिसकावून पळ काढला. त्यानंतर त्यांनी तत्काळ चांदवड पोलिसात तक्रार दाखल केली. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, तसेच मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी तपासाची चक्रे गतिमान केली.
यानंतर बाजार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण, स्थानिक नागरिकांकडून माहिती संकलन तसेच गुप्त बातमीदारांद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली. तपासादरम्यान चांदवड शहरातील (Chandwad City) गणूर चौफुली परिसरात दोन महिला संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आल्या. यावेळी त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अधिक चौकशीत संगिता अतिष सकटे (वय ३५), रा. भिमनगर, दर्गा वाली गल्ली, राजेंद्रनगर, इंदोर (मध्यप्रदेश) आणि संध्या विरु सबकटे (वय ३०), रा. भिमनगर, दर्गा वाली गल्ली, राजेंद्रनगर, इंदोर (मध्यप्रदेश) यांनी गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेली दिड तोळ्याची पोत पोलिसांच्या ताब्यात दिली.
दरम्यान, या संपूर्ण तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रविंद्र मगर, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, हवालदार भाऊसाहेब गुळे, स्वप्नील जाधव, विक्रम बस्ते, प्रदीप आजगे, भूषण साळवे, पाचपुते, गोविंद राऊत, तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या अचूक आणि वेगवान तपासामुळे चांदवड पोलिसांच्या (Chandwad Police) दक्षतेचे आणि कार्यक्षमतेचे नागरिकांकडून विशेष कौतुक केले जात आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांनी सजग राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसताच तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.




