नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सातपूरच्या (Satpur) अशोकनगरातील (Ashok Nagar) ज्ञानगंगा क्लासेसबाहेर मारहाणीनंतर बेशुद्ध पडल्याने संशयास्पद मृत्यू झालेल्या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांचा (Student) दोघांनी जबर मारहाण करुन खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. यशराज तुकाराम गांगुर्डे (वय १६) असे खून झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून, क्लासमध्ये ‘बॅच’ पुढे घेण्यास साांगितल्याने नकार दिल्यावर झालेल्या वादातून त्याच्यासोबतच्या विद्याथ्यांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त केला जात असून, पोलिसांनी सोळा वर्षीय दोघा मुलांना खुनाच्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.
यशराजचा मोठा भाऊ पारस गांगुर्डे (वय २१, रा. समर्थ रो हाउस, विश्वासनगर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर व महादेवनगरात राहणाऱ्या सोळा वर्षीय विधिसंघर्षित मुलांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यशराजचा भाऊ पारस हा ‘स्कूल व्हॅन’ चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. शनिवारी (दि. २) रात्री यशराजचा मृत्यू (Death) झाल्यानंतर रविवारी (दि. ३) सकाळी शवविच्छेदन करण्यात आले, त्यानंतर मृतदेह (Dead Body) ताब्यात घेण्यावरुन काही काळ तणाव निर्माण झाला, पोलिसांनी क्लासेसमधील सीसीटीव्ही तपासून दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगितल्यानंतर नातलगांनी यशराजचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले.
दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास यशराजच्या घरी मृतदेह आणल्यानंतर परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. शालेय विद्यार्थ्यांच्या किरकोळ वादातून घडलेल्या गंभीर गुन्ह्याबाबत सगळ्यांनी संताप व्यक्त केला जात असून सराईतांच्या गुन्हेगारीतून घडणारे नित्याचेच प्राणघातक हल्ले व खुनांचे (Murder) लोण आता विधिसंघर्षित बालकांच्या माध्यमातून थेट शाळा व खासगी क्लासेसमध्ये पोहोचल्याने बालगुन्हेगारीने गंभीर बळण घेतल्याचे समोर आले आहे.
बेंच पुढे सरकविण्याचा वाद
शनिवारी (दि. २) सायंकाळी साडेसहा वाजता यशराज घरुन पायी क्लासकडे निघाला. सायंकाळी पावणे आठ वाजता पारसला त्याची आई आशा यांचा फोन आला. ‘यश बेशुद्ध पडला असून त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले आहे. तू लगेच इकडे ये, असे त्या म्हणाल्या. रुग्णालयात पोहोचल्यावर पोलीस, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी यशराजच्या मृत्युबाबत त्याला सांगितले. दरम्यान, यशराजच्या क्लासमधील दोघांकडे पारसने विचारणा केली. त्यावेळी संशयित व यशराजमध्ये गुरुवारी (दि. ३१) रात्री आठ वाजता बेंच पुढे घेण्यावरुन वाद झाले होते. त्यांनी यशराजला शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्यानंतर शनिवारी (दि. २) यशराज सायंकाळी पावणे सात वाजता क्लासबाहेर उभा असताना संशयितांनी त्याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली. त्यातच यशराजच्या छातीबर, बरगड्यांवर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. तर अंतर्गत रक्तस्त्राव आणि जखमांमुळे यशराजचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद आहे.
संशयित आणि मृताचे कुटुंब सामान्य
ताब्यात असलेल्या दोन संशयितांपैकी एकाचे वडील रंगकाम करतात. तर, त्याची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. दुसऱ्या संशयिताचे वडील एका खासगी कंपनीत कंत्राटी कर्मचारी असून आई हातगाडीतून मसाल्याची विक्री करते. मृत यशराजचे वडील ‘स्कूल व्हॅन’ चालवायचे परंतु, करोना काळात कर्ज थकल्याने त्यांनी गळफास घेऊन चार वर्षांपूर्वी आत्महत्या केल्याचे समजते, विद्याथ्यर्थ्यांनी भाईगिरी, दमबाजी करण्याच्या नादात चुकीचे कृत्य केल्याने हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
विद्यार्थी क्लासमध्ये येण्यापूर्वी त्यांच्यात वाद झाले. त्यात यशराज बेशुद्ध झाल्याचे कळताच रुग्णालयात दाखल केले. त्याच्या दुर्दैवी मृत्युमुळे आम्ही देखील शोकमग्न आहोत.
कारभारी म्हस्के, संचालक, ज्ञानगंगा क्लासेस
खासगी क्लासेसबाहेर दोन विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याने अंतर्गत रक्तस्त्राव व जखमांमुळे एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. या घटनेमुळे विद्याथ्यांच्या शिस्तीबाबतचा मुद्दा समोर येतो आहे. पालकांनीही विद्याथ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला हवे. शालेय प्रशासन व खासगी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना संयमाची शिकवण देत व गंभीर कृत्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून द्यायला हवी.
रणजित नलवाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सातपूर
अशा घटना वाढत्याच
- मालेगाव येथे अल्पवयीन मुलांनी काही वर्षांपूर्वी खेळताना दुसया लहान मुलास पाण्यात डबक्यात फेकले होते, सीसीटीव्हीमुळे उकल झाली होती.
- मार्च २०२४ मध्ये देवळाली कॅम्प हद्दीत क्रिकेट खेळतांना मित्रांनी हाताच्या कोपऱ्याने गुप्तांगाजवळ मारल्याने (होल्कॅनिक शॉक) लवनील किरणकुमार भगवाने (वय १५) ठार झाला होता
- मार्च २०२५ मध्ये परिसरातील वर्चस्ववादातून गंगापूर पोलिसांच्या हद्दीत अरुण रामलू बंडी (वय १७, रा. खुटवडनगर) याचा खून झाला होता.
- आठ वर्षापूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ऋतिक राजू शेरगिल ऊर्फ पाप्या (वय १७, रा. फुलेनगर) याचा पाठलाग करून खून झाला होता. त्याप्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा नोंद
- काही वर्षांपूर्वी राणेनगर येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बेंचवरुन झालेल्या वादात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
- समाजात विधिसंघर्षित मुलांमध्ये हिंसेची भावना वाढत चालली आहे. या मुलांवर कुटुंबांनी वेळीच विशेष लक्ष देण्याची आवश्यकता .





