नाशिक | भारत पगारे | Nashik
बिबट्यांचे शहर (Leopard City) म्हणून नाशिककडे मिश्किलतेने पाहिले जात असतानाच नाशिक वनखात्याने (Nashik Forest Department) काही महिन्यांत पिंजरा (Case) बंद केलेल्या एकूण बिबट्यांपैकी १५ हून अधिक ‘संघर्षित’ बिबट्यांना गुजरातच्या (Gujarat) दावणीला बांधले जाणार आहे. त्यांची रवानगी जामनगरमधील ‘वनतारा’ प्रकल्पात करण्यासाठीचे प्रयत्न सुरु झाले असून, नाशिक वनखात्याने तसा प्रस्ताव नागपूरच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना पाठविल्याचे समजते. लवकरच या प्रस्तावास मंजुरी मिळणार असून राज्यातील सर्वच बिबटे वनतारात हलविण्यास कुणाचीही ‘हरकत’ नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
नाशिक वनपरिक्षेत्रातील पूर्व आणि पश्चिम भागात मोडणाऱ्या सिन्नर, नाशिक, इगतपुरी, निफाड, देवळा लीसह अन्य भागांत बिबट्यांचा अधिवास वाढलेला आहे. बिबटे मानवी वस्तीत शिरुन माणसांवर असल्याने हल्ले करीत मानव-बिबट संघर्ष टोकाला पोहोचला आहे. त्यातच, हा संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजनांचा उतारा फिरविला जात असतानाच, दुसरीकडे वनखाते तक्रार मिळताच पिंजरे तैनात करत आहे. त्यानुसार, गेल्या अकरा महिन्यांत नाशिक जिल्ह्यातील विविध प्रवण भागात लावलेल्या ९६ हून अधिक पिंजऱ्यात (Cage) ६४ हून अधिक बिबटे जेरबंद करण्यात यश आले आहे. यातील काही बिबटे नैसर्गिक अधिवासात मुक्त केल्याची माहिती पुढे आली असून काही बिबटे आजही दिंडोरीरोडवरील म्हसरूळच्या वन्यजीव उपचार केंद्रात (टीटीसी) आहेत.
दरम्यान, हे टीटीसी बिबट्यांच्या गर्दीन फुल्ल झाले असून दरदिवसाआड एक ते दोन बिबटे पिंजऱ्यात सापडत असल्याने पकडलेले बिबटे ठेवायचे कुठे, असा यक्ष प्रश्न नाशिक वनखात्याला पडला आहे. त्यानुसार, आता टीटीसीमधील कॉन्फ्लिक्ट बिबटे गुजरातच्या वनतारात धाडण्याची तयारी सुरू झाली आहे. नाशिकमधील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये बिबट्यांची गर्दी झाल्याने बिबटे कधीपर्यंत व कुठे ठेवणार या अडचणीतून वनतारातच स्थलांतरीत करण्याचा पर्याय रेटला जात आहे. पकडलेल्या बिबट्यांना पोसण्याचा खर्च वनविभागाला पेलवत नसून तशी ठोस तरतूदही नसल्याचे समजते.
हल्लेखोर बिबट्याची ओळख पटली
वडनेर दुमाला शिवारात बालकावर हल्ल्यात दोषी आढळलेल्या दोन आणि सिन्नर वनपरिक्षेत्रातील दोन अशा चार बिबट्यांना जन्मभर कैदेत ठेवण्याचा निर्णय झाला आहे. वडनेरला २२ ऑगस्ट रोजी पकडलेला बिबट्या तसेच २५ ऑगस्टला पिंपळगाव खांब शिवारात पिंजऱ्यात सापडलेल्या बिबट्याने आयुषवर हल्ला केलेला नव्हता हे स्वॅब अहवालातून निष्पन्न झाले आहे. तर २ सप्टेंबरला जलशुद्धीकरण केंद्राजवळ जेरबंद झालेल्या मादी बिबट्याच्या हल्ल्यात आयुषला प्राण गमवावे लागले, असे प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
दृष्टीक्षेपात
- अहिल्यानगरचे बिबटे माणिकडोहसह वनतारातच
- मानव-बिबट संघर्षातील अनेक बिबटे टीटीसीत
- नाशिकच्या वाढीव टीटीसीला नागपूरकडूनच मंजुरी
- श्रृतिक गंगाधरवरील हल्ल्याचा अहवाल प्रलंबित
- नाशिकचे सर्वाधिक बिबटे वनतारातच धाडणार
- चार महिन्यांत नाशिक तालुक्यात २२ बिबटे जेरबंद




