नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिकमधील बहुचर्चित म्हाडा जमीन घोटाळ्याप्रकरणी (MHADA Land Scam) गेल्या आठवडाभरापासून पोलीस कोठडीत (Police Custody) असलेल्या दोन बड्या अधिकाऱ्यांची रवानगी आता नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन काजळे आणि नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना जिल्हा न्यायालयात (Court) हजर करण्यात आले होते. न्यायालयाने बुधवारी (दि.१३) या दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावल्याने आता त्यांची रवानगी जेलमध्ये झाली आहे.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके (Sandeep Mitke) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. तपासात बिपीन काजळे याच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली. या शासकीय कार्यालयातच बनावट शिक्के आढळून आले. याच बनावट शिक्क्यांच्या आणि स्वाक्षऱ्यांच्या आधारे जमिनींच्या आरक्षणात मोठ्या प्रमाणावर फेरफार केल्याचा संशय आहे.
यापूर्वी अटक (Arrested) झालेला नायब तहसीलदार नितीन पाटील याने तब्बल ४९ पैकी ३१ प्रकरणांत बनावट नकाशांच्या आधारे मंजुरी दिली होती. महसूल विभागातील तलाठ्यांनी दिलेल्या धक्कादायक जबाबामुळे या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश झाला. अधिकारी, कर्मचारी आणि बांधकाम व्यावसायिक यांच्या संगनमताने नाशिकमधील मौल्यवान जमिनींचे आरक्षण कागदोपत्री बदलून कोट्यवधींचा डल्ला मारण्यात आल्याचे उघड होत आहे.
पुढचा नंबर कोणाचा?
या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिकेतील नगररचना विभाग आणि भूमी अभिलेख विभागात दहशतीचे वातावरण आहे. अनेक विभागांमधील कर्मचाऱ्यांनी दांडी मारली असून, आता पुढचा नंबर कोणाचा लागणार? या चर्चेने जोर धरला आहे. पोलिसांनी आपला मोर्चा या साखळीतील इतर संशयित तलाठी, तहसीलदार आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडे वळवला आहे.
बिल्डर लॉबीचे धाबे दणाणले
या घोटाळ्यात केवळ अधिकारीच नाही, तर बडे बांधकाम व्यावसायिकही अडकले आहेत. गंगापूर शिवारातील प्रकरणात सोनू मनवानी आणि म्हसरूळ शिवारातील गैरव्यवहारात दीपक करमचंदानी यांना झालेली अटक ही केवळ हिमनगाचे टोक मानले जात आहे. पोलीस आता कागदपत्रांच्या तांत्रिक पडताळणीत गुंतले असून, येणाऱ्या काही दिवसांत नाशिकमधील काही दिग्गज नावे या घोटाळ्यात समोर येण्याची दाट शक्यता आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठोस पुरावे हाती लागताच आणखी काही अटकेची कारवाई केली जाणार आहे.




