नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने (Water Resources Department) धरणांमधून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यास सुरुवात केली आहे. आज (२२ जुलै) दुपारी २ वाजता पालखेड धरणाचा विसर्ग ६७८ क्युसेकने कमी करण्यात आला असून, सध्या १,३७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कादवा नदीपात्रात सुरू आहे.
दुसरीकडे, गंगापूर धरणातून (Gangapur Dam) दुपारी ३ वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात (Godavari Riverbed) १९९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची अधिकृत माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
पुढील काळात पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधून होणाऱ्या विसर्गात आवश्यक्तेनुसार बदल करण्यात येतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने नदीकाठच्या नागरिकांना खालीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सुरक्षितता बाळगा : नदीकाठच्या नागरिकांनी व पर्यटकांनी नदीपात्रात जाणे टाळावे.
जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवा : जनावरे, वाहने आणि शेतीचे साहित्य सुरक्षित स्थळी हलवावे.
अफवांवर विश्वास ठेवू नका : कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता स्थानिक प्रशासनाने दिलेल्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे.




