पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati
युवासेना अध्यक्ष व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी आज (शनिवार) पंचवटीतील तपोवन परिसराला (Tapovan Area) भेट देत स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींची भूमिका जाणून घेतली. तपोवन परिसरातील पर्यावरण संरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या “तपोवन वाचवा – नाशिक वाचवा” आंदोलनात “जय श्रीराम” अशा घोषणांनी परिसर यावेळी दुमदुमला होता. यावेळी प्रथमेश गिते, वसंत गिते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी तपोवन परिसरातील प्रत्यक्ष पाहणी करून प्रतिक्रिया नोंदवताना, “पर्यावरण हा केवळ विकासाचा भाग नसून जनजीवनाशी थेट जोडलेला मुद्दा आहे, असे सांगितले. आपल्या पर्यावरण मंत्रीपदाच्या काळात मोठ्या प्रमाणात झाडांचे संवर्धन करण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तपोवन परिसरात एसटीपी प्रकल्पाच्या नावाखाली सुमारे ३०० झाडांची (Tree) तोड झाल्याचा आरोप करून प्रशासनाच्या भूमिकेबाबत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंदिर, तपोवन आणि साधुग्राम हा धार्मिक व पर्यावरणीय वारसा आहे. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पुढे ठाकरे म्हणाले की, कुंभमेळ्याला विरोध नसून MICE प्रकल्पासाठी पर्यायी जागा शोधावी तसेच तपोवन परिसराला ‘ग्रीन झोन’ घोषित करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच पुणे शहरातील घटनेचा संदर्भ देत पंचवटीतील एसटीपी प्रकल्पात अनियमितता झाल्याची शंका व्यक्त करून चौकशीची मागणीही ठाकरे यांनी केली. या आंदोलनामध्ये आजवर सत्ताधारी पक्षातील कोणताही आमदार उपस्थित नसल्याची खंतही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
तसेच तपोवनचा प्रश्न हा पर्यावरण (Environment) संवर्धनाचा असून आचारसंहिता उठल्यानंतर या परिसराला विशेष दर्जा द्यावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तर तपोवन व साधुग्राम परिसराचे रक्षण करण्यासाठी ही चळवळ व्यापक स्वरूप धारण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.




