Friday, May 15, 2026
HomeनाशिकNashik News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण...

Nashik News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

नाशिक | Nashik

जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे (Sinnar Assembly Constituency) आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दोघांना शिक्षेसोबतच प्रत्येकी ५० हजार दंड (Penalty) देखील भरावा लागणार आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलेल्या या निकालाविरोधात मंत्री कोकाटे उच्च न्यायालयात (High Court) जाऊन स्थगिती मिळवू शकतात.

- Advertisement -

कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला शासनाकडून म्हणजे मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका उपलब्ध केली जाते. त्यासाठी संबंधिताला आपल्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी १९९५ मध्ये अशी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्हू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या. इतकेच नव्हे तर, या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या, त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन(कमाल मर्यादा विनियमन) विभागाचे तत्कालीन विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह एकूण चार जणांविरुद्ध बनावट दस्तावेजाच्या आधारे सदनिका मिळवत शासनाची फसवणूक केल्याबाबत तक्रार दिली होती. त्यावरून चार जणांविरुध्द सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात गुरुवारी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

आमदार कोकाटेंची राजकीय वाटचाल

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सोमाठाणे येथे २६ सप्टेंबर १९५७ रोजी ॲड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचा जन्म झाला. कोकाटे यांना राजकारणात येण्यासाठी कुठलाही राजकीय वारसा नव्हता. त्यांनी राजकारणात येण्यापूर्वी कायद्याची पदवी घेतली. यानंतर त्यांनी राजकारणाची सुरुवात विद्यार्थी संघटना NSUI संघटनेत प्रवेश घेऊन केली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मधून राजकीय प्रवास सुरू केला. यानंतर माणिकराव कोकाटे यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीसाठी तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांनी सिन्नर विधानसभेची जागा पहिल्यांदा लढवली आणि जिंकली.

२००४ मध्ये त्यांनी ही जागा कायम ठेवली होती. यानंतर नारायण राणे यांच्या सोबत २००९ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. त्यानंतर २००९ साली सिन्नर विधानसभेतून ते तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर २०१४ साली त्यांनी भाजकडून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर पुन्हा २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि सिन्नरमध्ये त्यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर ते अजितदादा यांच्यासोबत गेले. यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत ४१ हजारांच्या मताधिक्याने ते पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले.

ताज्या बातम्या

AMC : महापालिका उभारणार कर्जावर व्यापारी संकुले

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महानगरपालिकेच्या विकास आराखड्यातील पाच महत्त्वाच्या व्यापारी संकुलाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकल्पांसाठी आवश्यक निधीपैकी 75 टक्के निधी...