नाशिक | वार्ताहर | Nashik
नीट परीक्षा पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान निवासासमोर आंदोलन करणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) दिलेल्या अमानुष वागणूक आणि विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर काँग्रेसतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली. नाशिक शहराध्यक्ष निलेश (बबलू) खैरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
घोषणाबाजीने परिसर दणाणला, वाहतूक कोंडी
आंदोलनादरम्यान काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. “मोदी सरकार निकमी है, ये सरकार बदलनी है”, “धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या”, “गृहमंत्री राजीनामा द्या” आणि “दिल्ली पोलिस हाय हाय” अशा घोषणांनी परिसर पूर्णपणे दणाणून गेला होता. यावेळी आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या निदर्शनांमुळे काही काळ परिसरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना साकडे
निदर्शनांनंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर केले. यात खालील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत
शिक्षणाचा खेळखंडोबा थांबवा : वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून विद्यार्थी व पालकांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे.
शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा व NTA बरखास्त करा : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच NTA बरखास्त करून परीक्षा प्रणाली पूर्णपणे पारदर्शक करावी.
दोषींवर कडक कारवाई : पेपरफुटी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी.
लाठीहल्ल्याची चौकशी : दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याची निष्पक्ष चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती
या आंदोलनात नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष निलेश खैरे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, उद्धव पवार, ज्ञानेश्वर काळे, अरुण दोंदे, जयेश पोकळे, विजय राऊत, सुदेश मोरे, संदीप वाघ, वृंदा शेरे, ज्युली डिसुझा, रमेश जाधव, भारत पाटील, जाकीर अत्तार, दत्ता सोनवणे, समाधान बागुल, अनिल बहोत, हर्षल पवार, जावेद पठाण, मुश्ताक कुरेशी, ज्ञानेश्वर चव्हाण, संतोष कस्तुरे, मोहन शिंदे, गौरव सोनार, भालचंद्र पाटील, इसाक कुरेशी, हेमंत पवार, प्रभाकर धात्रक, प्रवीण काटे, संजय पवार, सईद मनियार, बबलू सय्यद, अफरोज खान, राजेंद्र महाले, समीर शेख, हर्षवर्धन कापडणीस, अजिंक्य देवरे, विजय भालेराव, गोरख साळवे, अपूर्वा जाधव, गौरी जाधव, ऐश्वर्या डिसुझा, अयान खान, उमेश दासवाणी, सोमनाथ मोहिते, राहुल रौंदळ, अमोल सोनवणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




