नाशिक | प्रतिनिधी | Nashik
स्त्री हीच स्त्रीची शत्रू अशी वर्षानुवर्षे रूढ झालेली प्रतिमा आता बदलली पाहिजे. स्त्री पुरुष समानता निर्माण होऊन वर्ण आणि लिंगभेदाचा दुजाभाव संपुष्टात आला पाहिजे. सध्याच्या काळात भगिनीभाव जागवण्याची नितांत गरज असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr.Neelam Gorhe) यांनी व्यक्त केले.
दैनिक ‘देशदूत’च्या (Daily Deshdoot) विशेष संवाद कट्टयात त्या बोलत होत्या. डॉ. गोऱ्हे यांनी रविवारी (दि. १) ‘देशदूत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादक शैलेंद्र तनपुरे यांनी त्यांच्याशी विविध संवाद साधला. डॉ. गोऱ्हे यांनी राजकीय, सामाजिक आणि महिला सक्षमीकरणाच्या प्रश्नांवर दिलखुलास मते मांडली. शिवसेना फुटीच्या मुद्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, मी दोन्ही शिवसेनांमध्ये काम केले आहे. १९९८ साली प्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. २००२ मध्ये आमदार झाल्यानंतर हिंदू भाविकांसाठी मूलभूत सुविधा, ग्रामीण भागात शुद्ध पाणीपुरवठा आदी प्रश्नांवर सातत्याने काम केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उठावानंतर आपण त्यांच्या सोबत आलो, असे सांगताना त्या म्हणाल्या की, २०१९ मध्ये शिवसेना महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर काही नेत्यांना सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना निर्माण झाली. त्यातच उद्धव ठाकरे यांना आजारपणामुळे आलेल्या मर्यादा आणि काही व्यक्तींचे मातोश्रीवरील वाढलेले वर्चस्व या पार्श्वभूमीवर महिलांना न्याय देण्याच्या उद्देशाने आपण शिंदे यांच्यासोबत गेलो.
२०१४ नंतर महिलांची व्होट बँक आपोआपच तयार झाल्याचे सांगताना त्या म्हणाल्या की, ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिला सक्षम होत आहेत. त्यांच्यात जागृती वाढत आहे. मात्र, दुसरीकडे अत्याचारांच्या (Rape) घटनाही वाढत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. महिला आयोगाला अधिक अधिकार देण्याची गरज असून समान संधी, असंघटित कामगारांना संरक्षण आणि कामकरी महिलांसाठी स्वतंत्र आयोगाची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.




