नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी तालुक्यांतील (Dindori Taluka) विविध भागात आज (दि.१७ ऑगस्ट) रोजी दुपारी पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती. या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नसून प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२.४० वाजेच्या सुमारास पेठ तालुक्यातील गोंदे, भायगाव, जांभूळमाळ आणि हरणगाव परिसरात भूकंपाचे धक्के (Earthquake Tremors) जाणवले. त्याच सुमारास दुपारी १२.४० वाजता सुरगाणा आणि बोरगाव परिसरातही जमीन हादरल्याचा अनुभव स्थानिकांना आला. यानंतर अवघ्या काही मिनिटांतच, दुपारी १२.४५ वाजता दिंडोरी तालुक्यातील ननाशी आणि बाडगीचापाडा परिसरातही भूकंपाचे सौम्य धक्के बसले.
दरम्यान, अचानक बसलेल्या या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिक (Citizen) काही वेळासाठी घराबाहेर आले. परंतु, भूकंपाची तीव्रता अतिशय सौम्य असल्याने सर्वत्र परिस्थिती सुरक्षित आहे.या धक्क्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती सर्व ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने दिली आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे.




