नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जिल्हा आणि घाट प्रक्षेत्रात येत्या ४८ तासांत सूर्याचा (SUN) पारा वाढण्याची शक्यता असून, हवामान विभागाने (Meteorological Department) उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) इशारा दिला आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेल्या अंदाजानुसार, जिल्ह्यात (District) ११ ते १३ मे २०२६ या कालावधीसाठी ‘येलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.
हवामानाचा अचूक अंदाज
इगतपुरी कृषी संशोधन केंद्राच्या माहितीनुसार, ११ आणि १२ मे रोजी नाशिक जिल्ह्यासह घाट परिसरात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. हीच स्थिती १३ मे रोजीही कायम राहण्याचा अंदाज आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी विनाकारण बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी कृषी क्षेत्रावरील प्रभाव आधारित अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींवर लक्ष देण्यास सांगितले आहे.
कडाक्याच्या उन्हामुळे पिकांमधील बाष्पीभवनाचा वेग वाढू शकतो. अशा वेळी फळबागा आणि पालेभाज्यांना संध्याकाळच्या वेळी किंवा पहाटे पाणी द्यावे. वाढत्या तापमानाचा फटका दुभत्या जनावरांना बसू शकतो. जनावरांना सावलीत बांधावे, गोठ्यात हवा खेळती ठेवावी आणि त्यांना पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. शेतकरी (Farmer) बांधवांनी शेतातील कामे करताना डोक्याला पांढरा रुमाल किंवा टोपी वापरावी आणि सतत पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवावे.
प्रशासनाकडून सूचना
ग्रामीण कृषी मौसम सेवेमार्फत हवामानाचे अपडेट्स नियमितपणे दिले जात आहेत. नागरिकांनी हवामान बदलाच्या या काळात घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घ्यावी. असे आवाहनही इगतपुरी संशोधन केंद्राने केले आहे.




