पंढरपूर
शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन रोहित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळावरुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता.तर कर्जमाफी योजनेतील अन्यायकारक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. तसेच २०१९ मधील कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना नव्या योजनेतून वगळण्याची अट काढून टाकावी, अशीही त्यांनी भूमिका मांडली.
सरकार या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी, म्हणजेच २२ तारखेपूर्वी मुंबईत बैठक घेऊन या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे महाजन यांनी सांगितले.
यासंदर्भात सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर रोहित पवार यांनी काही दिवसांसाठी अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.




