Monday, June 22, 2026
HomeनाशिकNashik News : शाळेला टप्पा, क्रिकेटमधूनही बेपत्ता; एक दिवस त्याचा, रात्रीची धावपळ...

Nashik News : शाळेला टप्पा, क्रिकेटमधूनही बेपत्ता; एक दिवस त्याचा, रात्रीची धावपळ आणि कुटुंबाला चिंतेची झळ

रात्रीची धावपळ आणि कुटुंबाला चिंतेची झळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शाळेतील (School) प्रात्यक्षिक वर्गाची पिशवी खांद्यावर, पण मन मात्र क्रिकेटच्या मैदानात… (Cricket Ground) शनिवारी दुपारी घराबाहेर (House) पडलेला १७ वर्षांचा मुलगा सायंकाळ उलटूनही घरी परतला नाही आणि त्याच्या बेशिस्तीने अख्खे कुटुंब चिंता, भीती आणि कायदेशीर प्रक्रियेच्या गर्तेत सापडले.

- Advertisement -

जेलरोड परिसरातील (Jail Road Area) या घटनेत शाळेला दांडी मारून टपोरी मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेलेला ‘लाडका चिरंजीव’ अचानक वडिलांना नजरेस पडला. त्यांनी त्याला दोन शब्द सुनावले. त्यानंतर तो घाबरून पळून गेला. त्यानंतर सुरू झालेली शोधमोहीम थेट पोलीस ठाण्यापर्यंत (Police Station) पोहोचली. अखेर रात्री उशिरा मुलगा स्वतःहून घरी परतला खरा; मात्र तोपर्यंत कुटुंब कायदा, पोलीस आणि न्यायालयीन प्रक्रियेच्या वळणावर उभे राहिले होते.

शनिवारी सकाळी ‘प्रॅक्टिकल’साठी निघालेला मुलगा प्रत्यक्षात शाळेत न जाता मित्रांसह क्रिकेट खेळण्यासाठी गेला. सायंकाळ झाली तरी तो घरी न परतल्याने सुरुवातीला मित्रांकडेच असेल अशी समजूत कुटुंबीयांनी काढली. मात्र वेळ जसजसा पुढे सरकत गेला, तशी आई-वडिलांची अस्वस्थता वाढू लागली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वडिलांना राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ क्रिकेट खेळताना तो दिसला. वडिलांचा आवाज ऐकताच पळून गेला आणि त्यानंतर बेपत्ता झाला. रात्र होत गेली, काळजी वाढत गेली. अखेर मुलगा अल्पवयीन असल्याने आईने नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी (Police) तत्काळ तपास सुरू केला. दुसरीकडे आई-वडिलांसाठी ही रात्र भीती, अपराध भावना आणि अनिश्चिततेत गेली. पोलीस ठाण्यातील चौकशी, फोटो, कागदपत्रे यामुळे कुटुंबाची मानसिक दमछाक झाली. अखेर रात्री उशिरा हा मुलगा स्वतःहून घरी परतला. तो सुरक्षित होता, हा दिलासा मोठा होता. मात्र एकदा दाखल झालेला गुन्हा मागे घेता येत नसल्याने आता कुटुंबाला न्यायालयीन प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे. ही घटना केवळ एका मुलाच्या शाळा बुडवण्याची नाही, तर एका क्षणाच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब कसे कायद्यात सापडू शकते, याची जाणीव करून देणारी आहे.

बोचरी शिकवण

शालेय वर्गाला दांडी मारून मित्रांच्या संगतीने किक्रेटचे मैदान गाठणे क्षुल्लक वाटू शकते. मात्र अल्पवयीन मुलांच्या बाबतीत कायदा अत्यंत स्पष्ट आहे. मुलगा काही तासांसाठीही बेपत्ता झाल्यास पालकांना थेट पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागते आणि त्याचे परिणाम न्यायालयापर्यंत जातात. नाशिकसह राज्यात अशा घटना वारंवार घडतात. बहुतांश वेळा मुले सुरक्षित परततात, पण कायदेशीर प्रक्रिया कुटुंबासाठी आयुष्यभर लक्षात राहणारी शिक्षा ठरते. त्यामुळे पालक-मुलांमधील संवाद आणि मुलांनी आपल्या वयाची व जबाबदारीची जाणीव ठेवणे, ही आज काळाची गरज आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची...

0
ओझे l वार्ताहर | Oze नाशिक शहरात (Nashik City) अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून बेकरी व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या तिघांविरुद्ध एमआयडीसी...