नाशिक । विजय गिते | Nashik
पावसाने (Rain) दीर्घकाळ दडी मारल्याने राज्यातील २० जिल्ह्यांमधील (District) ८६ तालुक्यांत ३० दिवसांपेक्षा अधिक काळ पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. काही तालुक्यांत तर हा खंड ४० दिवसांपेक्षाही अधिक आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) नांदगाव, मालेगाव, येवला, देवळा आणि चांदवड या तालुक्यांचाही समावेश आहे.यामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात सापडला आहे.
परिणामी खरीप पिके ऐन वाढीच्या आणि उत्पादनाच्या टप्प्यात असताना पावसाअभावी करपण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑगस्टपासून अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडल्याने मका, कापूस, बाजरी, सोयाबीन आणि खरिपातील कांदा पिकांच्या (Onion Crop) वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. नांदगाव, मालेगाव, येवला, देवळा आणि चांदवड या तालुक्यांना तर याचा मोठा फटका बसला असून पावसाच्या खंडाचा शेतीवर मोठा परिणाम जाणवत आहे. यामुळे नुकसानग्रस्त क्षेत्राच्या प्रत्यक्ष पाहणीची प्रक्रिया पुढे सुरू होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) उत्तर व पूर्व भागात पावसाच्या खंडाचा फटका अधिक जाणवत आहे. मका, कापूस आणि अन्य पिकांच्या (Crops) वाढीवर त्याचा परिणाम झाला आहे. अलीकडे काही भागांत हलक्या ते मध्यम सरी झाल्या असल्या, तरी दीर्घ खंडामुळे झालेली तूट भरून काढण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे.
५ ऑक्टोबरनंतर प्रत्यक्ष पाहणी
पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५ ऑक्टोबरपासून दुष्काळी स्थितीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधीच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार प्रत्यक्ष पाहणी करून पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. त्यानंतरच नुकसान आणि मदतीचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पावसाच्या खंडामुळे राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईची स्थितीही निर्माण होत आहे. नाशिकच्या काही तालुक्यांमध्ये खरीप पिकांबरोबरच पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्नही कायम आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस किती होतो, यावर खरिपाचे उत्पादन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.
जिल्ह्यात १८ सप्टेंबर अखेर तालुकानिहाय झालेला पाऊस टक्केवारीत
मालेगाव : 59.1 बागलाण : 90.0, कळवण : 88.6, नांदगाव : 57.3, सुरगाणा : 80.3, नाशिक : 95.7, दिंडोरी : 105.3, इगतपुरी : 40.5, पेठ : 64.9, निफाड : 105 , सिन्नर : 70.9, येवला : ५०.३, चांदवड : 86.0, त्र्यंबकेश्वर : 110.3, देवळा : 77.7, जिल्हा एकूण 68.5 टक्के.




