नाशिककरांचे जनजीवन पुर्वपदावर येण्यास सुरवात ; वाहतुक कोंडी
नाशिक । प्रतिनिधी
करोना प्रादुर्भाव व संक्रमण रोकण्यासाठी देशभरात तिसर्या टप्प्यातील लॉकडाऊन संपण्यासाठी सहा दिवस शिल्लक असतांना शेवटच्या टप्प्यात राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडुन विना अत्यावश्यक दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. ठप्प झालेले अर्थचक्र सुरु होण्यासाठी झालेल्या निर्णयानुसार नाशिक शहरात दीड महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडत आहे. अचानक मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुक कोंडी सुरू झाली असुन अशाप्रकारे हळूहळू जनजीवन पुर्वपदावर येऊ लागले आहे.
देशात करोनाचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी केंद्र सरकारने प्रथम जनता कर्फ्यु आणि नंतर लॉकडाऊन जाहीर केले होते. करोनावर लस सापडलेली नसल्याने घरात राहुन सुरक्षित रहावे आणि सामाजिक अंतर राखुन व्यवहार करावेत असे आवाहन शासनाकडुन करण्यात आले होते. यात केवळ अत्यावश्यक सेवा असलेले दवाखाने रुग्णालये, मेडीकल दुकाने, किराणा , बेकरी, दुध डेअरी, भाजीपाला, चिकन – मटन व अंडी दुकानांना सहा तासाची परवानगी देण्यात आली होती. हा लॉकडाऊन आता तिसर्या टप्प्यातील अंतीम चरणात पोहचला आहे.
गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत संपुर्ण अर्थचक्र ठप्प झाल्याने संभाव्य उपासमारी – बेकारी रोकण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथीलता आणत काही सवलती दिल्या आहे. यात आता अखेरच्या टप्प्यात राज्य शासनाने विना अत्यावश्यक सेवा – दुकानांसह उद्योगांना सशर्त परवानगी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिक शहरातील बाजारपेठा या ४५ दिवसानंतर गजबजलेल्या दिसु लागल्या आहे. यात खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडत असुन वाहनामुळे शहरातील सीबीएस, रविवार कारंजा, त्र्यंबकनाका व त्रिमुर्ती चौक अशा भागात वाहतुक कोंडी होऊ लागली आहे.
शहरातील शासकिय कार्यालयात शासनाने तीस टक्के उपस्थितीला परवानगी दिली असल्याने आता नाशिक महानगरपालिका मुख्यालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय कंपाऊंड मधील सर्वच कार्यालये, विभागीय महसुल आयुक्त कार्यालय यांच्यासह शासकिय, निम शासकिय कार्यालयातील वर्दळ वाढली आहे. कमी कर्मचार्यात कामांना अद्याप वेग आलेला नसला तरी नागरिकांची शासकिय कार्यालयात वर्दळ मात्र दिसत नाही. तसेच शहरातील सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील ४ हजाराहून अधिक कारखान्यांना सुरू करण्यात सशर्त परवानगी दिली असुन काही कारखान्यांची कामे सुरू झाली आहे. यामुळे आता औद्योगिक वसाहतीत वर्दळ दिसू लागली आहे.
शहरातील हॉटेल, सलून, लग्न, सभा संमेलन अशा गर्दी होणार्या किंवा थेट संपर्क येणार्या व्यवसाय व कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. एकुणच आता शहरातील जनजीवन पुर्वपदावर आले आहे. गेल्या दीड महिन्यापासुन घरात अडकुन पडलेले नागरिक आता दुकानांच्या वेळेत वाढ केल्यामुळे खरेदीसाठी आणि कामांसाठी बाहेर पडत आहे.
पोलीस बळाअभावी वाहतुक कोंडीत भर
नागरिक शासनाकडुन मिळालेल्या शिथीलतेचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहे. अजुन शहरातील वाहतुक निंत्रण करणारी सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आलेली नाही. तसेच चौकात पोलीस दिसत नाही. परिणामी शहरात चौक, सिग्नलवर वाहतुक कोंडीत भर पडत आहे. तसेच शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रासाठी लावण्यात आलेले बॅरेकेटींग व पोलीस बळ कमी केल्याने यात भर पडत आहे. मुबंईकडुन येणार्या व मालेगांवकडे जाणार्या वाहनांना अडविण्याचे आदेश नाही. अशा वाहनांना शहराबाहेर काढुन देण्याचे काम पोलीस करीत आहे. पाथर्डी फाटा, मुंबईनाका भागात द्वारका भागात वाहतुक सुरळीत करुन देण्याचे काम पोलीस करीत आहे.




