नाशिक । प्रतिनिधी
कर्करोगाचे निदान करुन देण्याच्या बहाण्याने रुग्णांच्या नातलगांकडून लाखो रूपये उकळून फसवणूक करणार्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. गोविंदा दुर्गा वरगट्टी आणि गोविंदा जिरप्पा मल्लापल्लू (दोघे रा. बंजारवाडी, मानखुर्द, मुंबई) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या संशयितांनी नाशिकसह, पुणे, मालाड, ठाणे, गुजरात राज्यातील वापी येथेही नागरिकांना लाखो रूपये घेऊन गंडा घातल्याचे निष्पन्न होत आहे.
नाशिकरोड येथील पारिजातनगर परिसरातील एका महिलेस डिसेंबर २०१९ मध्ये संशयितांनी १० लाख रुपयांना गंडा घातला होता. महिलेच्या पतीस कर्करोग झालेला असताना संशयितांनी महिलेशी संपर्क साधून आयुर्वेदिक औषधांनी कर्करोग बरा होईल असे सांगितले. सुरुवातीस २६ हजार रुपयांत औषध दिले. त्यानंतर संशयितांनी महिलेकडे १० लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास औषध खराब होईल व पतीचा मृत्यू होईल अशी भितीही दाखवली. त्यामुळे महिलेने त्यांना पैसे दिले होते. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हे शाखा युनिटएकच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला असता दोघांचा तपास लागला व त्यांना मुंबईतून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी नाशिकसह इतर जिल्ह्यांमधील रुग्णांच्या नातलगांनाही गंडा घातल्याचे उघडकीस आले. संशयितांकडून पोलिसांनी ४५ हजार रुपये जप्त केले आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी, सचिन खैरनार, दिनेश खैरनार, पुष्पा निमसे, उपनिरीक्षक बलराम पालकर, सहायक उपनिरीक्षक पोपट कारवाळ यांच्यासह वसंत पांडव, अनिल दिघोळे, संजय मुळक, प्रविण कोकाटे, विशाल देवरे आदी कर्मचार्यांनी ही कारवाई केली.
अशी होती पद्धत
ही टोळी शहरात रुम व गाळा भाडेतत्वाने घेत असत. त्यानंतर मोठ्या रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांच्या नातलगांना आयुवेर्दिक गोळ्यांनी आजार बरा होईल असे सांगत असत. सुरुवातीस कमी पैशांत औषधे देत. त्यानंतर त्यांनी दिलेलीच औषधे घ्या नाहीतर रुग्ण दगावेल अशी भिती नातलगांना देऊन नातलग भितीपोटी संशयित सांगेल त्या किंमतीत गोळ्या घेत असत.