नाशिक | विजय गिते | Nashik
जिल्ह्यात मागील मोसमात मे महिन्यांपासून सुरू झालेल्या पावसाने (Rain) सलग सहा महिने हजेरी लावली. विक्रमी पावसामुळे यंदा जलसाठा मुबलक राहील, अशी चिन्हे होती. मात्र, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण २४ धरणांमध्ये (Dam) गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.५३ टक्के साठा जास्त असला तरी नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणासह चार मोठ्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा कमी झाल्याने पाणीकपातीचे संकट निर्माण झाले आहे.

जिल्ह्यातील सात मोठ्या प्रकल्पांचा आढावा घेतला असता, केवळ मुकणे, चणकापूर आणि गिरणा या तीनच धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पाणीसाठा (Water Storage) आहे. उर्वरित चार प्रमुख प्रकल्पांत पाणी झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः नाशिक शहराचा मुख्य आधार असलेल्या गंगापूर धरणात गेल्यावर्षी ७२.४३ टक्के साठा होता, जो यंदा केवळ ५९.११ टक्के आहे. म्हणजेच शहराच्या मुख्य साठ्यात १३.६३ टक्क्यांनी घट झाली आहे.
प्रशासकीय माहितीनुसार, जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या धरणांतील एकूण जलसाठा सध्या ५७.८९ टक्के (४०,८८४ दशलक्ष घनफूट) आहे. मागील वर्षी याच काळात हा साठा ४९.३६ टक्के (३६,४४९ दशलक्ष घनफूट) होता. कागदावर साठा जास्त वाटत असला तरी वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन आणि वाढती मागणी पाहता एप्रिल-मे महिन्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, गंगापूर धरणातील (Gangapur Dam) साठा ६० टक्यांच्या खाली आल्याने आणि उन्हाळ्याचे अडीच महिने बाकी असल्याने महापालिका पाणीकपातीचा निर्णय घेणार का, अशी साशंकता व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून सध्या पाणीकपातीचा विचार नसल्याचे संकेत असले, तरी नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे झाले आहे.
प्रमुख धरणांतील स्थिती (टक्केवारी)
धरण – सध्याचा साठा – मागील साठा
गंगापूर – ५९.११ टक्के – ७२.४३ टक्के
दारणा – ५६.६५ टक्के – ६३.९१ टक्के
करंजवण – ५७.८ टक्के – ५८.५७ टक्के
मुकणे – ६४.९७ टक्के – ५७.६७ टक्के
गिरणा – ४८.४८ टक्के – ४२.९८ टक्के




