नाशिक | Nashik
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना खरात प्रकरणात (Kharat Case) क्लीन चीट दिल्यास किंवा यंत्रणेने पाठीशी घातल्यास तसेच अटक न केल्यास महिला काँग्रेस (Mahila Congress) रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी दिला. त्या आज (बुधवारी) नाशिकमध्ये (Nashik) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
यावेळी त्या म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहे तरी काही नेते मौन बाळगून आहेत. देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, सरकार त्याकडे दुलर्क्ष करत अशी टीकाही त्यांनी केली. तसेच महिलांसाठी आरक्षण देताना ओबीसी व अल्पसंख्याक महिलांनाही स्वतंत्र आरक्षण लागू करावे आणि त्याची अंमलबजावणी २०२३ पासूनच करावी, अशी मागणीही संध्या सव्वालाखे (Sandhya Sawalakhe) यांनी केली.
नीट पेपरफुटी प्रकरणावर (Neet Paper Leak Case) बोलताना त्या म्हणाल्या की, गेल्या १२ वर्षांत ८९ पेपरफुटीच्या घटना घडल्या, मात्र कारवाई शून्य आहे. सरकारचा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी, मागणी संध्या सव्वालाखे यांनी केली. तसेच सामान्य नागरिकांना वाहन कमी वापरण्याचे आवाहन केले जाते, मात्र मंत्री आणि नेते मोठ्या ताफ्यांसह फिरतात. नियम फक्त सामन्यांसाठीच आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तसेच खरात प्रकरणात चित्रा वाघ (Chitra Wagh) किंवा रूपाली चाकणकर यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही. एवढे मोठे प्रकरण घडूनही संबंधित संस्थेच्या विश्वस्तांना काहीच माहिती नाही. त्यामुळे हे मान्य होऊच शकत नाही, असेही सव्वालाखे म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा स्वाती जाधव, माजी नगरसेविका वत्सला खैरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.




