नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गॅस आणि एलपीजीच्या प्रचंड तुटवड्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण आणि निमशहरी भागातील जनता ‘चुली’कडे वळू लागली आहे. मात्र, हीच चूल एका तरुण कुटुंबासाठी काळ ठरली असून, चूल पेटवताना भडका उडाल्याने बावीस वर्षीय विवाहितेचा अंत झाला आहे.
नाशिकमधील वडाळागाव परिसरातील अण्णाभाऊ साठेनगर येथे राहणाऱ्या रोहिणी किरण कापसे (वय २२) या काही दिवसांपासून इंधन टंचाईमुळे स्वयंपाक बनवण्यासाठी चुलीचा वापर करत होत्या. (दि. १४) रात्री घरात चूल पेटवत असताना अचानक भडका उडाला. या आगीत रोहिणी यांच्या दोन्ही पायांना, पोटाला आणि छातीला गंभीर इजा झाली.
घटनेनंतर त्यांचे पती किरण कापसे यांनी त्यांना तातडीने नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान अखेर (दि. १९) पहाटे डॉ. सुयोग ठाकूर यांनी मृत घोषित केले.
युद्धाच्या झळा गरिबांच्या उंबरठ्यावर
इराण-इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्याचे गणित कोलमडले हाेते. त्याचे थेट पडसाद सामान्यांच्या स्वयंपाकघरात उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात सीएनजी आणि एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोट्यवधी कुटुंबांना गॅस सिलिंडरसाठी झगडावे लागत लागत असल्याने नाईलाजास्तव पारंपारिक चुलीचा आधार घ्यावा लागला. वडाळागावातील या घटनेने हे वास्तव समोर आणले असून इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हवालदार शेख तपास करत आहेत.





