
नाशिक | Nashik
नेपाळमध्ये आलेल्या महापुरात (Flood Flash) अडकलेल्या राज्यातील पर्यटकांच्या (Tourist) शोधासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या (Central Government) माध्यमातून नेपाळ सरकारच्या संपर्कात आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी आज (गुरुवारी) दिली.
यावेळी माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, राज्यातील पर्यटक दोन बसच्या माध्यमातून तेथे गेले आहेत. ४५ जणांचे दोन गट आहेत. त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे स्वत: केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत. माझ्या घराशेजारील कुटुंबही नेपाळ, कैलास मानस सरोवर यात्रेसाठी गेले आहे. त्यांच्याशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यासोबत राज्यासह अन्य राज्यातील पर्यटक, भाविक आहेत, असे त्यांनी सांगितले.
तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) त्यांच्या जिल्ह्यातून नेपाळ, कैलास मानसरोवर यात्रेस गेलेल्या पर्यटकांची माहिती संकलित करण्यास सांगितले आहे. विभागाचे संकेतस्थळ कार्यरत आहे. विभागाचे अधिकारी २४ तास सतर्क असून ते नेपाळमधील पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही मंत्री महाजन यावेळी म्हणाले.




