नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शेतात काम करताना बिबट्याची (Leopard) धास्ती, तर रात्री मानवी वस्तीत अचानक दिसणाऱ्या बिबट्यामुळे निर्माण होणारी भीती, या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात बिबट्या मानव संघर्ष कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (एसएनजीपी) यशस्वी ठरलेला व्यवस्थापन पॅटर्न नाशिकमध्ये (Nashik) राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी अत्याधुनिक व शास्त्रीय ‘एकात्मिक कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्याचे ‘हाय रिस्क झोन आणि ‘मिडियम रिस्क झोन असे वैज्ञानिक वर्गीकरण करण्यात येणार आहे. ज्या भागांत बिबट्यांचा वावर अधिक आहे किंवा पूर्वी संघर्षाच्या घटना घडल्या आहेत, त्या भागांत अत्याधुनिक यंत्रणा, जलद प्रतिसाद पथके आणि सतत देखरेख व्यवस्था उभारली जाणार आहे. मध्यम धोक्याच्या भागात प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती आणि खबरदारीच्या सूचना प्रभावीपणे राबवण्यात येतील. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या मोठी असतानाही मानवी हल्ल्यांचे प्रमाण तुलनेने कमी आहे.
यामागे शास्त्रीय नियोजन, प्रशिक्षित रेस्क्यू टीम्स, तत्काळ प्रतिसाद प्रणाली आणि स्थानिक नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. हाच यशस्वी अनुभव नाशिकसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. ‘बिबट्यामुक्त नाशिक’ नव्हे तर ‘बिबट्या संघर्षमुक्त नाशिक’ घडवणे यासाठी आराखडा तयार केल्याची माहिती वनखात्याने (Forest Department) दिली आहे. त्यामुळे वन्यजीव संवर्धन आणि मानवी सुरक्षितता या दोन्ही बाबींचा समतोल साधला जाणार आहे.
संघर्ष टाळणे हाच उद्देश
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी नाशिक, अहिल्यानगर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांच्याशी चर्चा करून या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश बिबट्यांना नष्ट करणे नसून, मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळणे हा आहे, असे नमूद केले आहे.
असा असेल एकात्मिक कृती आराखडा
- संपूर्ण जिल्ह्यात हाय रिस्क व मिडियम रिस्क झोन.
- दोन्हींचे वैज्ञानिक वर्गीकरण.
- जखमी व आजारी बिबट्यांसाठी विशेष उपचार व बचाव केंद्र.
- बिबट्यांचे नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन.
- अफवा, गैरसमज दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती.
- सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड व हरित क्षेत्र वाढवण्यावर भर




