नाशिक | Nashik
शहरातील (City) नागरिकांच्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी विशेष लक्ष देणार असून येत्या दोन वर्षात नाशिक इंदूरपेक्षा (Indore) अधिक बेस्ट सिटी करण्याचा संकल्प महापालिकेच्या नूतन आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मनपाच्या कामात बदल करण्यासोबतच नागरिकांचे साधारण प्रश्न गतीने सोडवण्यासाठी कार्यप्रणालीत बदल करण्यासोबतच मागील काळात सुरू केलेली कामे गतीने पुढे घेऊन जाणार असल्याचे आयुक्त खत्री यांनी सांगितले. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे स्वच्छ पाणी, लसीकरण, शिक्षण यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नूतन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी गुरुवारी पदभार स्वीकारताच शुक्रवारी (दि.२७) सकाळी आयुक्तांच्या दालनात पत्रकार परिषद घेत नाशिक शहराच्या (Nashik City) विकासाबाबत संवाद साधला.आर्थिक निधी महत्वाची बाब असून ते पाहूनच प्राधान्यक्रमाने काम करणार आहे. प्रत्येक विभागाला सूचना दिल्या असून सुरू असलेले आणि प्रस्तावित प्रकल्पाची माहिती घेणार आहे. कामाचे डेस्क कमी करून थेट त्या अधिकाऱ्यांच्या पातळीवरच प्रश्न सोडवण्यासाठी कामात नवीन बदल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शासनाद्वारे अवलंब केलेल्या विविध तंत्रज्ञानाचा वापर करून कामात पारदर्शकता आणण्याचा मानस आहे. त्यासाठी ई ऑफिस सुरू करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. शासनाचे जे सॉफ्टवेअर वापरात आहे तेच अवलंबण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. कामाला शिस्त लागणे आवश्यक असून ऑनलाईन कामांबर भर दिला जाईल.
येत्या काळात कुंभमेळा (Kumbh Mela) असून नियोजनासाठी कमी कालावधी आहे. विभागीय आयुक्तांना चांगला अनुभव असून त्यांच्या चांगल्या संकल्पना आहेत. त्यावर आम्ही पूर्ण लक्ष देऊन काम करणार आहोत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर सर्वांचे मार्गदर्शन घेऊन काम करू. शहरातील वाहतूक समस्या गंभीर असून, ट्रान्सपोर्ट हा माझा प्राधान्याचा विषय आहे. त्यावर स्मार्ट पर्याय काय काढता येऊ शकतो त्यावर विचार केला जाईल. चांगले रस्ते कसे राहतील याचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाचे मुद्दे
नागरिकांच्या तक्रारी व अपेक्षा जाणून घेणार
शासनाकडे गेलेल्या नोकरी भरती प्रस्तावाचा पाठपुरावा करणार
गोदावरी स्वच्छतेला विशेष प्राधान्य देणार
अतिक्रमण कारवाई करताना योग्य पर्याय काढणार
समन्वय ठेवून काम करणार
आयुक्त लागले कामाला
पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन कामाच्या दिशा स्पष्ट करतानाच सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी मनपाच्या सर्व विभागांना भेटी देऊन विभागांची तोंडओळख करून घेत कामाला गती देण्याचे संकेत दिले.
गोदावरी परिसराची पाहणी
महानगरपालिकेच्या ( Municipal Corporation) आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच आयुक्त मनीषा खत्री यांनी पाहणीचा धडाका सुरू केला. कामाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी गोदावरी परिसराची पाहणी केली. तेथील प्रश्नांची माहिती जाणून घेतली व अधिकाऱ्यांना विविध विकासकामांबाबत सूचना केल्या. या दौऱ्यात त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे आदींसह अधिकारी उपस्थित होते.या पाहणीदरम्यान शाश्वत पर्यटनाच्या अनुषंगाने पर्यटकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने गोदावरी नदीकाठ परिसर, अहिल्याबाई होळकर पुलाखालील पायऱ्या, वस्त्रांतरगृह, रामकुंड परिसर, अहिल्याबाई होळकर पुलापासून ते गाडगे महाराज पुलापर्यंतचा नदीकाठ व नदीचा परिसर, पंचवृक्ष परिसर, सीतागुंफा परिसर, काळाराम मंदिर व त्यालगतचा शाही मार्ग परिसर त्याचप्रमाणे श्रीराम उद्यानापासून ते रामकुंडापर्यंतच्या रस्त्याची व विविध ठिकाणांची पाहणी केली. पाहणीदरम्यान आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी या परिसराचा विकास करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या.
नाशिक शहरातील या परिसराचा जागतिकस्तरावर आयकॉनिक पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी केंद्र शासनामार्फत मंजूर प्रकल्पात करण्यात येणारी कामे त्याव्दारे स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ व शाश्वत पर्यटन हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश साध्य होणार असल्याने शाश्वत पर्यटनाचे पालन करून त्याचा एकूण अनुभव पर्यटकांना देण्यासाठी प्रयत्न करणे कामी रामकाल-पथ प्रकल्प पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या.रामकाल-पथ प्रकल्पांतर्गत विविध सुविधायुक्त कामे लेझर शो, पाण्याचे कारंजे फवारे, बोटींग, तात्पुरते वस्त्रांतरगृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पार्किंग सुविधा, नो व्हईकल झोन, नो प्लास्टिक झोन करण्याच्या सूचना दिल्या. रामकुंड येथे स्नानासाठी योग्य पाण्याचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने नियोजन करणे तसेच रामायणातील विविध प्रसंग, म्युरल्स, पुतळे, भित्तीचित्रे, कमानी, दीपस्तंभ व आकर्षक विद्युत रोषणाई वाव्दारे संपूर्ण परिसराचे सुशोभिकरण करण्याचे कामी हाती घेण्याच्या सुचना दिल्या.