नाशिक | Nashik
त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे श्रावण महिन्यात १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत भरणाऱ्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी (Dr. D.S. Swami) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
त्र्यंबकेश्वर येथील यात्रा व प्रदक्षिणेसाठी दोन ते तीन लाख भाविक (Devotee) येतात. या पार्श्वभूमीवर मंदिरात सुरक्षेच्या दृष्टीने बॅग, पिशव्या नेण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी कमीत कमी साहित्य सोबत आणावे, भाविकांनी मौल्यवान वस्तू सोबत आणू नयेत. यात्रेत बेवारस वस्तू आढळून आल्यास तिला स्पर्श न करता त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी.
कोणीही व्यक्ती संशयास्पद हालचाली करीत असेल, तर ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी. वाहने अधिकृत वाहनतळावरच लावावीत. भाविकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणी जाणीवपूर्वक अफवा पसरवत असतील, तर पोलिसांच्या (Police) निदर्शनास आणून देत पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी केले आहे.




