मनमाड | प्रतिनिधी | Manmad
शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर (Pune-Indoor) आणि नाशिक-जळगाव महामार्गांवर (Nashik Jalgaon Highway) गेल्या काही महिन्यांपासून रोज होत असलेली वाहतूककोंडी आणि नांदगाव शहरातील वाहतूक समस्येसंदर्भात विधानसभा अधिवेशनात आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी आवाज उठवत लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. मनमाड, नांदगाव या दोन्ही शहरांची वाहतूककोंडीमधून सुटका करण्यासाठी उड्डाणपूल आणि बाह्य वळण रस्त्यांची मागणी केली. या मागणीस मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
गेल्या आठवड्यात दै. ‘देशदूत’ने (Deshdoot) वाहतुकीच्या कोंडीबाबत बातमी दिली होती. त्याची आमदार सुहास कांदे यांनी दखल घेऊन थेट विधानसभेत आवाज उठवला. आमदार कांदे यांनी वाहतुकीची समस्या गंभीर झाली असल्याबाबत शासनाचे केवळ लक्षच वेधले नाही तर मागणी मंजूर करून घेतल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदूर, नाशिक-जळगाव आणि नांदगाव शहरातून जाणारा नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्ग या तिन्ही मार्गांवरून रोज शेकडो वाहनांची होणारी वाहतूक, ठिकठिकाणी रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेले मोकाट जनावरे, रस्त्यावर नादुरूस्त होणारे वाहन, बेशिस्त वाहनचालक आदींमुळे महामार्गावर रोज तासन्तास वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्याचा त्रास वाहनधारकांसोबत नागरिकांनादेखील सहन करावा लागतो.
यासंदर्भात आमदार कांदे यांनी आज थेट विधानसभेत (Vidhansabha) लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाचे या समस्येकडे लक्ष वेधले. मनमाड शहर हे दीड लाख लोकसंख्येचे आहे. या शहरातून पुणे, इंदूर, नाशिक जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर महामार्ग जातात. या रस्त्यावर असलेल्या मालेगाव चौफुलीवर वाहतुकीची रोज प्रचंड कोंडी होते. शहरात ऑईल कंपन्या, एफसीआय यामधून रोज शेकडो वाहने जातात. या मार्गावर एक पूल आहे तो कमकुवत झालेला आहे. चार वर्षांत शंभर लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडल्यामुळे मतदारसंघात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. या रस्त्यासाठी अनेक महिन्यांपासून आपण पाठपुरावा करत आहे.
नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी या महामार्गावर उड्डाणपूल बांधणे किंवा बाह्य वळण रस्ता द्यावा, अशी मागणी व विनंती असल्याचे आमदार कांदे यांनी सांगितले. या मागणीला उत्तर देताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार कांदे यांनी मनमाड आणि नांदगाव शहराची जी समस्या मांडली त्याला सरकार सकारत्मक असून या रस्त्याची गरज आहे ही वस्तुस्थिती आहे. मालेगाव, मनमाड, कोपरगाव दरम्यान खासगीकरणातून रस्ता तयार करण्यात आला होता. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकाकडून टोल घेतला जात होता. त्याची मुदत डिसेंबर २०२५ ला संपणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गअंतर्गत काम सुरू केले जाणार असल्याचे सांगितले.




